रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी करवाई करण्यात आली आहे.   

Updated: Nov 4, 2020, 10:00 AM IST
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक title=

मुंबई : एका जुन्या आत्महत्या केस प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करवाई करण्यात आली आहे . मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक केली आहे. २०१८ साली इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या अर्णब यांनी अलिबागमध्ये घेवून जाण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांच्या पुढील अडचणी अधिक वाढल्या आहेत. 

एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी जबरदस्ती धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. शिवाय मुंबई पोलिसांनी कशाप्रकारे धक्काबुक्की करत त्यांना ताब्यात घेतले आहे, याचे काही फोटो देखील रिपब्लिक वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रामाणे #ArnabGoswami हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. 

याशिवाय मुंबई पोलिसांनी सासू-सासरे, मुलगा, आणि पत्नी यांना देखील मारहान केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. रिपब्लिक वाहिनीवर सध्या हे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं.