कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार - मुख्य सचिव संजय कुमार

 राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला. 

Updated: Jul 1, 2020, 12:30 PM IST
कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार - मुख्य सचिव संजय कुमार title=

मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरु असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी  सांगितले. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त मुख्य सचिवांचे स्वागत केले. यावेळी  मेहता यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल. 

तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाच राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. या काळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते ते रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे ते म्हणालेत.

मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या ९१८४ च्या तुकडीचे असून आता पर्यंतच्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. १९८५ मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

१९९७ मध्ये उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेचे प्रकल्प समन्वयक, ऊर्जा नियामक आयोगाचे सचिव म्हणूक काम पाहिले आहे. गृहनिर्माण या विभागांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता.