शिवसेनेचं फडणवीस यांना उत्तर - देवेंद्र भौ, आमचं चुकलंच!

भाजपच्या आंदोलनावरून शिवसेनेचा निशाणा

Updated: May 22, 2020, 04:27 PM IST
शिवसेनेचं फडणवीस यांना उत्तर - देवेंद्र भौ, आमचं चुकलंच! title=

मुंबई :  कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात आंदोलन केलं. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेनं उपरोधिक शब्दांत उत्तर दिलं आहे. देवेंद्र भौ, आमचं चुकलंच, असं म्हणत शिवसेनेनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत महाराष्ट्रातील जनतेची काळजी वाहत आहेत, त्यांची जबाबदारी घेत आहेत. कोविड सेंटर उभारून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. भाजपच्या नेत्यांसारखे टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावून चमकायला सांगत नाहीत. म्हणून देवेंद्र भौ, आमचं चुकलंच!, असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

खरंच देवेंद्र भौ, आमचे चुकलेच !!! आम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या नाहीत, बेडूक उड्या, कोलांट उड्या मारल्या नाहीत, दिवे घालवून दिवे जाळले नाहीत, वारंवार भाजप, सॉरी  राज्यपाल यांच्याकडे गेलो नाही, देवेंद्र भौ आमचे खरंच चुकले!!, अशी टीका कायंदे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कोरोनातून लोकाना वाचवण्यासाठी कठोर झाले, त्यांनी हजारो बेडसची व्यवस्था केली, कोविड सेंटर उघडली, १० रुपयांची शिवभोजन थाळी ५ रूपयांत तर अनेक ठिकाणी मोफत दिली, रेल्वेने मजुरांना घरपोच पाठवले, पाच लाख मजुरांची तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली, खरंच देवेंद्र भौ, आमचे चुकलेच!!, असे कायंदे यांनी उपरोधिक शैलीत बजावले आहे.

आम्ही राजकरण करू शकलो नाही. देवेंद्र भौ, कारण आमचे नेते उद्धव ठाकरे आहेत. जे कामातून बोलतात. टाळ्या आणि थाळ्या वाजवून नाचायला आणि दिवे घालवून दिवे जाळायला  सांगत नाहीत. म्हणून देवेंद्र भौ आमचे चुकलेच !! असा टोला हाणत शिवसेना प्रवक्ता डॉ मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आंदोलनावर टीका केली.

गेले दोन महीने मार्च महिन्याच्या १४ तारखेपासून ते अगदी आजपर्यंत सतत दिवसरात्र महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी घेऊन काळजी वाहणारा, त्यांना कोरोनाच्या मृत्युच्या जबड्यातून वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करणारा, जनतेला घरी रहा आणि खबरदारी घ्या, मी तुमची जबाबदारी घेतो असं म्हणणारा अत्यंत धोरणी आणि धडाकेबाज मुख्यमंत्री फ़क्त महाराष्ट्रातील नव्हे देशातील, जगातील जनता अनुभवते आहे. उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वाचे कौतुक तुमच्या केंद्रीय नेत्यांना सुद्धा आहे, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.

 

अवघ्या महिन्याभराच्या आत हजारो रुग्णांची व्यवस्था करणारे कोविड सेंटर मुंबईच्या प्रमुख भागात उभे करुन हजारो रुग्णांची व्यवस्था आधीच करुन ठेवणे, इतर राज्यातील मजूराना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी दररोज 20/30 रेल्वे गाड्या, बस गाड्या, एसटी, ट्रक, खाजगी वाहने यांची व्यवस्था करुन त्यांना सुखरूप आपल्या घरी पोहचवणे, कोरोना योद्धे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलिस, सफाई कामगार, बँकेतील कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठादार, दूध, भाज्या, फळे आदी गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे श्रमजीवी, शेतात राबणारे शेतकरी, कष्टकरी, आदिवासी अशा अनेकांशी सतत संपर्कात राहून त्याना धीर देण्याचे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री स्वतः करत आहेत, अशा शब्दांत भाजपच्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. हे सोडून त्यांनीही आम्हाला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे घालवा, दिवे जाळा, कोलंट उद्या मारा, माकड उड्या मारा, काळा रंग फासा, काळा फलक घेवून बोंबलत सुटा हे करायला सांगितले नाही. खरंच देवेंद्र भौ, आमचे चुकलेच, अशी उपहासात्मक टीका कायंदे यांनी भाजपवर केलीय.