Ayodhya Verdict: अन् शिवनेरी किल्ल्यावरच्या मातीने चमत्कार घडला- उद्धव ठाकरे

येत्या २४ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येला जाण्याच्या संकेतही उद्धव यांनी दिले.

Updated: Nov 9, 2019, 05:13 PM IST
Ayodhya Verdict: अन् शिवनेरी किल्ल्यावरच्या मातीने चमत्कार घडला- उद्धव ठाकरे title=

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदूंच्या भावनेला न्याय मिळाला, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते शनिवारी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गेल्यावर्षीच्या आपल्या अयोध्या दौऱ्याचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, गेल्यावर्षी २४ नोव्हेंबरला मी अयोध्येला गेलो होतो. तेव्हा मी शिवनेरी किल्ल्यावरची माती अयोध्येला नेली होती. या मातीने काहीतरी चमत्कार घडले, असे मला वाटतच होते आणि माझ्या दौऱ्याला वर्ष होण्यापूर्वीच अयोध्येचा निकाल आला, असे उद्धव यांनी म्हटले. 

अयोध्या निकालाचा आनंद पण.... संभाजी भिडेंची प्रतिक्रिया

या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अशोक सिंघल आणि लालकृष्ण अडवाणी यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणीही जागवल्या. आता मी लवकरच दिल्लीत जाऊन लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेईन, असेही उद्धव यांनी म्हटले. हे नेते केवळ तोंडी हिंदुत्त्व मानणारे नव्हते, तर त्याचे आचरण करणारे होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. याशिवाय, येत्या २४ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येला जाण्याच्या संकेतही उद्धव यांनी दिले. 

निकालाकडे जय-पराजय म्हणून बघू नये - मोहन भागवत

या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानता उद्धव यांनी म्हटले की, मी न्यायदेवतेला साष्टांग नमस्कार करतो. या निर्णयात सरकारचे श्रेय आहे किंवा नाही, हे मी सांगू शकत नाही. परंतु, न्यायदेवतेचं श्रेय निश्चितच आहे. यानिमित्ताने सगळ्यांनी जो समजुतदारपणा दाखवला, तो नेहमी दाखवला तर भारत देश महाशक्ती होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.