निवडणूक सोडा, आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा- उद्धव ठाकरे

शांत बसून राहणे, ही मर्दानगी नव्हे.

Updated: Feb 15, 2019, 02:42 PM IST
निवडणूक सोडा, आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा- उद्धव ठाकरे title=

मुंबई: केंद्र सरकारने आता निवडणुकीचा विचार न करता आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावावा, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना म्हटले की, सरकारने आता निवडणुकांचा विचार बाजूला सारून पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. यासाठी सर्व देश त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे उद्धव यांनी सांगितले. यावेळी काही पत्रकारांनी गुप्तचर यंत्रणांचे अपयश आणि केंद्र सरकारच्या दाव्याबद्दल उद्धव यांना विचारणा केली. त्याला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले की, नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले? आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता सरकार पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी मिळालेली गुप्त माहिती ज्यांनी गांभीर्याने घेतली नाही, त्यांना पदावरून दूर हटवले पाहिजे. इतकी महत्त्वाची माहिती दुर्लक्षित करणे, कदापि खपवून घेता येणार नाही, असे उद्धव यांनी सांगितले. 

तसेच या हल्ल्यानंतर सरकारने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, शांत बसायचे म्हणजे नक्की काय करायचे? शांत बसून राहणे, ही मर्दानगी नव्हे. मात्र, तरीही सरकार म्हणते तसे आम्ही शांत बसून आहोत. पण मग तुम्ही मर्दानगी दाखवा, पाकिस्तानात घुसा. यापूर्वी भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा मला अभिमान आहे. परंतु, हा सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीर म्हणजे एकप्रकारे भारतीय भूमीतच झाला होता. मात्र, आता थेट पाकिस्तानमध्ये घुसावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.