बृहन्मुंबई महानगरपालिका : जाणून घ्या आयुक्त इक्बाल चहल यांच्याविषयीच्या खास गोष्टी

हे तुम्हालाही ठाऊक नसेल.... 

Updated: May 9, 2020, 07:30 AM IST
बृहन्मुंबई महानगरपालिका : जाणून घ्या आयुक्त इक्बाल चहल यांच्याविषयीच्या खास गोष्टी  title=
इक्बाल चहल

मुंबई : शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. ही घडामोड होती ती म्हणजे आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी केलेली बदली.

राज्‍य शासनातर्फे महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्‍य सच‍िव (१), नगर विकास विभाग या पदावर नियुक्ती केली.  त्यांच्या जागी इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शुक्रवारी  म्हणजे दिनांक ८ मे २०२० या दिवशी सायंकाळी महानगरपालिका आयुक्‍त म्‍हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी ते प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्‍यांच्‍याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्‍त कार्यभारही होता. 

चहल यांच्याविषयीची काही खास माहिती..... 

२० जानेवारी १९६६ रोजी जन्‍मलेल्‍या इक्बाल सिंग चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स एण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.

भारतीय प्रशासकीय सेवेत जवळपास ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव या पदांचा पदभार सांभाळला आहे.

चहल यांची एकंदर कामगिरी पाहता, केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्‍ये सोपवली होती.

वाचा : पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशींची उचलबांगडी, हे आहे खरं कारण

गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरीच्या आधारे जानेवारी २०१८ मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार मिळाला. इक्बाल चहल यांच्या नेतृत्वाखाली ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार २००२ देखील मिळाला आहे. 

 

प्रशासकीय सेवेत असण्यासोबच क्रीडा क्षेत्रातही त्यांचा वावर दिसून येतो. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्‍ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणून देखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.