मंत्रालय का बनत चाललंय सुसाई़ड पॉईंट? प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्याची गरज

मंत्रालयात आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याची वेळीच गंभीर दखल घेण्याची गरज आहे. प्रशासन याबाबत का अपयशी ठरतंय? सर्वसामान्यांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागत आहे.

शैलेश मुसळे | Updated: Aug 23, 2022, 07:01 PM IST
मंत्रालय का बनत चाललंय सुसाई़ड पॉईंट? प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्याची गरज title=

मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत अनेकांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आज एकाच दिवसात 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मंत्रायल आता सुसाईड पॉईंट बनत चाललंय अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

आज मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावातल्या जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने पेटवून घेतल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. याबाबत गृहमंत्री फडणवीसांनी विधानसभेत निवेदन दिलं. त्यानंतर संध्याकाळी एकाने तर थेट मंत्रालयाच्या टेरेसवर चढूनच आत्महत्येची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मार्च महिन्यात देखील एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रूपा मोरे असे या महिलेचे नाव होतं. पोलिसांनी महिलेला वेळेत रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

मे महिन्यात हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीने कुटुंबातील दोन महिलांसह मंत्रालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे त्यांचे प्राण वाचले होते.

जवळपास 3 वर्षापूर्वी एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे महिलेचा जीव वाचला होता

मंत्रायलात असे आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सूटत नसल्याने नागरिक थेट मंत्रालयात येवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असं ठोकाचं पाऊल उचलनं योग्य नाही. पण प्रशासनाने देखील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

दररोज हजारो लोकं आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात येत असतात. त्यांचे प्रश्न सुटतील या आशेने ते मंत्रायलयात चकरा मारत असतात. त्यामुळे जर सर्वसामान्यांचे प्रश्न वेळेत सूटले आणि त्याची योग्य वेळी दखल घेतली गेली तर यामुळे नागरिकांना इतकं टोकाचं पाऊल उचलण्यापासून रोखता येईल.