मुंबई धोक्यात!

समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे, भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भाग येत्या ९० वर्षांत बुडण्याची शक्यता आहे. देशातल्या २२० वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडलाय. महानगरी मुंबईला हा धोका सर्वाधिक असल्याचंही सांगण्यात येतंय.

Updated: Jun 5, 2012, 08:11 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे, भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भाग येत्या ९० वर्षांत बुडण्याची शक्यता आहे. देशातल्या २२० वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडलाय. महानगरी मुंबईला हा धोका सर्वाधिक असल्याचंही सांगण्यात येतंय.

 

मायानगरी मुंबई.. २४ तास जाग असणारं स्वप्नांचं शहर.. समुद्रातल्या लाटेप्रमाणे कोट्यवधी स्वप्न इथं एका क्षणात निर्माण होतात आणि विरतातही.. एखाद्या दिवशी ही स्वप्नच बुडण्याची शक्य़ता आहे.. आणि यासाठी वेळ लागेल फक्त ९० वर्षांचा.'गेट वे ऑफ इंडिया' आहे त्याच ठिकाणी ९० वर्षांनी दिसेल, याची कुठलीच शाश्वती आत्ता देता येणार नाही. मुंबईचा नेकलेस अशी ओळख असलेला सुंदर परिसर मरीन ड्राईव्ह फक्त गोष्टींपुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. हॉलिवूडच्या कुठल्या सायन्स फिक्शन सिनेमातील ही कल्पना नाही, तर एक भीतीदायक वास्तव आहे.

भारत सरकारच्या दुस-या राष्ट्रीय सूचना अहवालात हे सत्य मांडण्यात आलंय. हा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या क्लायमेट चेंज फ्रेमवर्क कनवेंशनला सादर करण्यात आलाय. १९०० ते २१०० सालापर्यंत समुद्रातला जलस्तर ३.५ इंचांवरुन ३४.६ इंचांपर्यंत वाढण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.  ही शक्यता जर वास्तवात उतरली, तर मुंबईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

ईश्वराचा प्रदेश अशी ओळख असलेल्या केरळ राज्यावरही या लाटांच्या संकटाचं सावट आहे. जीवनदायिनी गंगा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदीसारख्या नद्यांचे त्रिभूज प्रदेशही संपुष्टात येऊ शकतात. सरकारी अहवालात सादर केलेल्या शंका आपण दुर्लक्षित करु शकणार नाही. कारण १२० रिसर्च सेंटर आणि २२० वैज्ञानिकांच्या मदतीनं हा अहवाल तयार करण्यात आलाय. पर्यावरणीय बदलामुळं सर्वात जास्त प्रभावित होणा-या ठिकाणच्या प्रत्यक्ष दौ-यांनंतर, वैज्ञानिंकानी अभ्यासाअंती हे मत मांडलंय... जलस्तरात झालेल्या वाढीनं किना-यालगत असलेल्या भूगर्भाचं मिठागरात रुपांतर होण्याची शक्यता आहे.. तसचं काही भाग बुडण्याचीही शक्यता आहे.. अहवालानुसार सर्वात जास्त धोका गुजरातच्या खंभाट आणि कच्छची किनारपट्टी, मुंबई आणि कोकणची किनारपट्टी आणि दक्षिण केरळवर आहे..

 

समुद्रातला जलस्तर वाढल्याने कोणकोणत्या किनारपट्टीवरील भाग बुडू शकतात, याची माहिती शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी डिजिटल एलिवेशन मॉडेलचा वापर केला..समुद्रातील जलस्तरात १ ते २ मीटर वाढ झाली, तर ४.२ ते ४२.५ किलोमीटर परिसरातील किनारपट्टी भाग बुडू शकतो. बंदरांच्या आणि पायाभूत सोयीसुविधांमध्ये विकासाशी संबंधित योजनांसाठी आता या अहवालाचा वापर करण्य़ात येणार आहे, यामुळे त्यात योग्यवेळी बदल करता येऊ शकतील.