`मी येतोय` म्हणत.... बाप्पा `गावाला गेलेही`..

गेले दहा दिवस गणपती बाप्पांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अवघे वातावरण भारून टाकले होते . जिकडे - तिकडे मोरयाचाच गजर घुमत होता.

Updated: Sep 29, 2012, 09:30 PM IST

www.24taas.com, मुंबई
गेले दहा दिवस गणपती बाप्पांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अवघे वातावरण भारून टाकले होते . जिकडे - तिकडे मोरयाचाच गजर घुमत होता. शनिवारीही हाच गजर घुमला , पण काहीशा जड अंत : करणाने . दहा दिवस बाप्पाच्या सान्निध्यात काढल्यानंतर त्याला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या .
मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी दुपारच्या सुमारास गणेश विसर्जनास सुरुवात झाली . गणेश गल्लीतील मानाचा गणपती ` मुंबईचा राजा `, ` गिरणगावचा राजा ` ची मिरवणूक प्रचंड गर्दीत निघाली . मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे . ठिकठिकाणी राजावर पुष्पवृष्टी केली जात आहे . मुंबईत इतरत्रही गुलालाची उधळण आणि ढोल - ताशांचा गजर टिपेला पोहोचला होता. गिरगाव चौपाटी , पवई येथील विहार तलावांसह ठिकठिकाणचे तलावांच्या परिसरात गणेशभक्तांचा महापूर आला आहे ..
आरत्यांच्या आर्त स्वरांनी वातावरण मंगलमय झाले आहे . कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे . सायंकाळी सहापर्यंत संपू्र्ण मुंबईत लहान - मोठ्या सुमारे २ हजार मूर्तींचे विसर्जन झाले असून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे.