चला गणपती गावाकडं चला...

गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 8, 2013, 11:15 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, सिंधुदुर्ग
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.
गणेशोत्सव जवळ आला की मुंबईतील चाकरमान्यांना वेध लागतात ते आपल्या गावचे.. म्हणजेच कोकणात जायचे. आता गणेशोत्सव अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय म्हणूनच मुंबईतील हा चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागलाय. मग हा चाकरमानी आपल्या गावापेक्षा कितीही दूर असो आणि त्याच्याकडे पैशांची कितीही चणचण असो, मात्र हा चाकरमानी वेळ पडल्यास कर्ज काढतो पण कोणत्याही परिस्थितीत कोकणात जाऊन गणरायाचा हा उत्सव साजरा करतोच.
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात दाखल होत असल्यानं पोलिसांवरचा ताणही चांगलाच वाढलाय.सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी चोख बंदोबस्त केलाय. तर चाकरमान्यांमुळं कोकणातल्या बाजारपेठाही आता फुलून गेल्या आहेत.
गणरायाच्या आगमनाला आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक असल्यानं कोकणातील प्रत्येक घरामध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार लगबग सुरु आहे. कोकणामध्ये गणेशोत्सवाची ही धूम आता इथून पुढं पंधरा दिवस अशीच सुरु राहणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.