लक्ष्मणरेषा ओलांडू नका, पंतप्रधानांची खासदारांना तंबी

खासदारांच्या मुक्ताफळांमुळं भाजपा सरकारच्या अडचणी वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी तंबी दिली. मंगळवारी भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी वाचाळवीरांची कानउघाडणी केली.

Updated: Dec 16, 2014, 06:50 PM IST
लक्ष्मणरेषा ओलांडू नका,  पंतप्रधानांची खासदारांना तंबी title=

नवी दिल्ली: खासदारांच्या मुक्ताफळांमुळं भाजपा सरकारच्या अडचणी वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी तंबी दिली. मंगळवारी भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी वाचाळवीरांची कानउघाडणी केली.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या खासदारांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळं पक्षाची आणि सरकारची बदनामी झाली असून विरोधकांनी या मुद्यावर चांगलाच गोंधळ माजवला होता. त्यामुळं काहीवेळा तर खुद्द पंतप्रधानांना माफी मागावी लागली होती. या सर्वांमुळं नाराज झालेल्या पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत सर्वांना समज दिली. तसंच हाती घेतलेलं काम फक्त कागदावर नको तर प्रत्यक्षातही दिसू द्या, असंही त्यांनी खासदारांना सांगितलं आहे. 

यापूर्वी केंद्रीय मंत्री साध्वी निरांजन ज्योती तसंच साक्षी महाराज यांच्या वक्तव्यांमुळं विरोधकांनी गोंधळ घातला होता. तुम्हाला रामजाद्यांचं सरकार हवं की हरामजाद्यांचं असं विधान साध्वींनी दिल्लीत प्रचारसभेत केलं होतं. दिल्लीकरांनी मत देताना ‘रामाचा सुपुत्र ’आणि ‘अनौरस’ यापैकी एकाची निवड करावी, असं त्यांनी म्हटलं होतं. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी ज्योती यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसंच ज्योती यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली. या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज अनेकदा तहकूब करावं लागलं होतं. 

तर नथुराम गोडसे हे राष्ट्रभक्त होते असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलं होतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ माजल्यावर त्यांनी घूमजाव केलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.