मलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!

प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 13, 2013, 09:32 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,संयुक्त राष्ट्र
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.
पाकिस्तानात ऑक्टोबर २०१२मध्ये तालिबानी हल्यात मलाला गंभीर जखमी झाली. तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तिने काल शुक्रवारी संयुक्त राष्ट्रली संबोधित केले. यावेळी तिने शिक्षणाला महत्व देण्याचे आवाहन केले.
आपण सर्वांनीच जाती, वंश, रंग, लिंग यांच्या आधारावरती पारंपरिक मानसिकता बदलायला हवी. महिलांना त्यांच्या विकासासाठी स्वातंत्र्य आणि समानतेच्या संधी मिळायला हव्यात. त्यासाठी जगभरातल्या माझ्या बहिणींनी साहसी व्हायला हवं. त्यासाठी त्यांच्यामधल्या शक्तिची आणि गुणांची पुरेपूर जाणीव त्यांना व्हायला हवी. बंधु आणि भगिनींनो, प्रत्येक मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हाला शाळा हव्यात, शिक्षण हवं.
शिक्षण आणि शांतता या ध्येयाच्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू आहे. त्यामध्ये आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी आग्रहानं बोलणार आणि बदलही घडवणार. आमचा आमच्या शब्दांवर आणि त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. आमच्या शब्दांमध्ये सगळ्या जगाला बदलण्याची ताकद आहे. कारण आपण सगळे शिक्षणाच्या ध्येयासाठी एकत्र आहोत.

जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर, आपण सक्षम होऊया. ध्येयासाठीच्या या लढ्यात ज्ञान हे आपलं शस्त्र असेल तर एकता आणि अखंडता या आपल्या ढाली असतील.
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. आपण विसरता कामा नये की, लाखो मुलं आजही शाळेत शिकू शकत नाहीत. म्हणूनच आपण एकत्र येत निरक्षरता, गरीबी आणि दहशतवाद संपवण्याचा निर्धार करूया.
आपण बोलूया, पुस्तकांच्या माध्यमातून बोलूया. लेखणीच्या माध्यमातून बोलूया. कारण शब्द हेच सगळ्यात धारधार शस्त्र आहे. एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक लेखणी अख्खं जह बदलू शकतं. सगळ्यावर शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. सगळ्यात आधी शिक्षणच महत्वाचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.