सर्व भारतीय मच्छिमारांना करणार मुक्त; पाकचा निर्णय

पाकिस्तानची सद्भाभना जागी झालीय. पाकिस्तानी तुरुंगात गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2013, 07:25 AM IST

www.24taas.com, कराची
पाकिस्तानची सद्भाभना जागी झालीय. पाकिस्तानी तुरुंगात गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.
‘बिलावल हाऊस’मध्ये राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी बोलावलेल्या एका बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तानी गृहमंत्री रेहमान मलिक यांनी ही घोषणा केलीय. ‘तुरुंगात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांच्या समीक्षेचे आदेश देण्यात आलेत’ असं मलिक यांनी म्हटलंय.
पाकिस्तानच्या कैदेतील भारतीय मच्छिमारांची नेमकी संख्या जाहीर न करता मलिक यांनी म्हटलं, ‘पाकिस्तान सरकारनं तुरुंगात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पडताळणीचे आदेशही देण्यात आलेत. लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाईल’. भारत-पाक संबंध दृढ व्हावेत म्हणून सद्भावनेला हातभार लावण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

पाकिस्तानच्या जेलमध्ये खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांच्या सुटकेसाठी कायदेशीररित्या प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते पाकच्या वेगवेगळ्या तुरुंगात जवळपास १६८ मच्छिमार बंद आहेत. सर्वात जास्त मच्छिमार कराचीच्या मलीर जेलमध्ये बंद असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय.