झी युवाच्या मालिकांचे शतकोत्सव उत्साहात साजरे!!

झी नेटवर्क गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे आणि सर्वोत्तम असे कार्यक्रम देऊन त्यांचे मनोरंजन करत आहे. “नवे पर्व युवा सर्व “म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहीनी "झी युवा" ही झी नेटवर्क ने महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच लाँच केली होती .

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 6, 2017, 11:40 PM IST
झी युवाच्या मालिकांचे शतकोत्सव उत्साहात साजरे!! title=

मुंबई : झी नेटवर्क गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे आणि सर्वोत्तम असे कार्यक्रम देऊन त्यांचे मनोरंजन करत आहे. “नवे पर्व युवा सर्व “म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहीनी "झी युवा" ही झी नेटवर्क ने महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच लाँच केली होती .

झी युवा या वाहीनीला आता ५ महीने पूर्ण होत आले आहेत , आणि वाहीनीवरील बन मस्का , फ्रेशर्स , श्रावण बाळ , इथेच टाका तंबू , युवगिरी आणि लव्ह लग्न लोचा या सहा ही मालिकांचे १०० एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. आज या कार्यक्रमांचे यश पाहून अख्खी तरुणाई या वाहीनीच्या आणि तिच्या कार्यक्रमांच्या प्रेमात पडली आहे हे दिसून येते. झी युवा वाहीनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर एक नवे पर्व सुरु झाले आहे जे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना टीव्ही बघण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव देत आहे. 

आज महाराष्ट्राच्या टेलिव्हीजन बघणाऱ्या लोकसंखेमध्ये अर्ध्याहून अधिक टक्के प्रेक्षकवर्ग हा युवा आहे आणि खास त्यांच्या आवडीसाठी अशी ही वाहीनी आहे. जोश, उत्साह, प्रेम, शौर्य, करुणा अश्या तारुण्याच्या पंचरसांनी परिपूर्ण असलेले कार्यक्रम प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील कॉलेज युवांपासून ते तरुण पिढीपर्यंत सगळ्यांनाच असे जोशपूर्ण, हलके-फुलके, आजच्या प्रेक्षकवर्गाला आपलेसे वाटणारे, चैतन्यपूर्ण असे कार्यक्रम झी युवावर दाखवण्यात येतात.  १०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे प्रत्येक मालिकेच्या सेटवर सर्वच कलाकारांनी शतकोत्सव सेलिब्रेट केला.
 
१०० भागांच्या प्रवासात जाणून घेऊया मालिकांच्या यशाचे रहस्य:
बन मस्का: बन मस्का या मालिकेत शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचळ हे मैत्रेयी आणि सौमित्र यांची भूमिका साकार करतात. यांची प्रेमी युगुलांची, एक अतिशय ट्विस्टेड लव्हस्टोरी अतिशय सुरेख प्रकारे दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी या मालिकेत दाखवली आहे. मैत्रेयी एक व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट आहे आणि तिचे तिच्या आई बरोबर जराही पटत नाही. त्यामुळे ती पुण्यामध्ये तिची माई आजी म्हणजेच ज्योती सुभाष यांच्या बरोबर राहत असते.
ह्या दोघांचे निखळ प्रेम हे या कार्यक्रमाचे USP आहे .

 फ्रेशर्स: फ्रेशर्स मधील महाराष्ट्रातील वेग-वेगळ्या भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलेल्या ७ तरुणांच्या स्वप्नांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. खूप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कलाकार ओंकार राऊत, मिताली मयेकर, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, सिद्धार्थ खिरीड आणि शुभंकर तावडे यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे.  ‘फ्रेशर्स’ ही मालिका आपल्यातील प्रत्येकाच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देण्यात यशस्वी ठरली आहे.

इथेच टाका तंबू: इथेच टाका तंबू ही गोष्ट आहे एका सुशिक्षित सुसंस्कृत तरुण कपिलची, जो त्याच्या आजी च्या सांगण्यावरून कोकणात येतो आणि रामाश्रय या हॉटेलची जबाबदारी त्याच्यावर येउन पडते. हॉटेलच्या चित्र विचित्र माणसांच्या सहवासात त्याला गौरीची साथ लाभते आणि त्यांची प्रेमकहाणी हळू हळू बहरते. सध्या या कार्यक्रमात सिद्धार्थ मेनन ची एन्ट्री झालीय आणि शशांक केतकर, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ मेनन यांच्यामध्ये बरंच काही शिजतेय. कलाकारांच्या अभिनयातील साधेपणामुळे आणि सच्चेपणामुळे ही मालिका लोकप्रिय होत आहे. 

श्रावणबाळ रॉकस्टार: श्रावणबाळ रॉकस्टार ही गोष्ट आहे हृषिकेश तिळगुळकर याची, ज्याला मोठा संगीतकार व्हायचे असते, पण त्याच्या आई बाबांचे संगीत या विषयावरून भांडण असते. त्या दोघांना सांभाळत हृषिकेश नोकरी करायला लागतो. तिथे त्याची बॉस कामिनी ला तो आवडू लागतो तर हृषिकेश त्याच्या शेजारी राहणाऱ्या नितुवर प्रेम करायला लागतो. संगीताची कला जोपासण्यासाठी तो पार्ट टाइम रेडिओ जॉकी सुद्धा बनतो. हृषिकेशची ही सगळी नाती सांभाळताना होणारी धावपळ लोकांना आवडू लागली आहे. मुख्यतः कामिनी आणि नितु मध्ये हृषिकेश कोणाचा होईल ही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहीली आहे. नीरज गोस्वामी, केतकी पालव आणि संचिता कुलकर्णी यांचा सहज सुंदर अभिनय हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य आहे. 

लव्ह लग्न लोचा: ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेच्या नावावरूनच काहीतरी भन्नाट बघायला मिळणार आहे हे वाटणे साहजिकच आहे. या मालिकेत तरुणाईची तत्त्वं, दोस्ती-यारी, भावना, त्यांचे जुगाड, प्रेम आणि त्यांचं एक वेगळंच जग दाखविण्यात आले आहे. या मालिकेमध्ये आजच्या तरुण पिढीच्या प्रेमापासून सुरू झालेला प्रवास, त्यामध्ये येणा-या अडचणी, प्रेम, मैत्री ते लग्न आणि त्यातून होणारे लोचे, आई-वडिलांच्या इच्छा, स्वप्नं, मुलाचं लग्न करून देण्याची घाई या सगळ्या गोष्टींचं गमतीशीरपणे पण प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं चित्रण केले आहे.रुचिता जाधव , सिद्धी कारखानीस , समिहा  सुळे , अक्षया गुरव , सक्षम कुलकर्णी ,ओंकार गोवर्धन , श्रीकार पित्रे आणि विवेक सांगळे यांच्या अभिनयाचे प्रेक्षक चाहते झाले आहे आहेत. आणि प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले आहेत.

युवागिरी:  तरुणाईला मध्यवर्ती धरून महाराष्ट्र पालथा घालत, अनेक वैविध्यपूर्ण आणि न पाहीलेल्या गोष्टी आणि ठिकाणे युवागिरी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. आज पर्यंत युवागिरीमध्ये प्रेक्षकांनी न पाहीलेल्या अश्या अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत ज्यामुळे युवगिरी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रधार स्नेहा चव्हाण आणि अपूर्वा रांजणकर यांनी अतिशय उत्तमरीत्या या शो चे सूत्रसंचालन केले आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युवगिरी पोहोचला आहे.