मनसेतील बेदिलीमुळे दिला पक्षाचा राजीनामा- हर्षवर्धन

र्षवर्धन जाधव यांनी आमदाराकीचा राजीनामा मागे घेतला आहे.. तर मनसेला मात्र रामराम केला आहे.

Updated: Jan 10, 2013, 05:07 PM IST

www.24taas.com, मुंबई
हर्षवर्धन जाधव यांनी आमदाराकीचा राजीनामा मागे घेतला आहे.. तर मनसेला मात्र रामराम केला आहे. राज ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान कृष्णकुंजवर ही बैठक होते आहे.
मनसेवर आर्थिक देवाण-घेवाण करण्याचे आरोप झाल्यानंतर काल मनसे नेते बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंची बैठक झाली होती. त्यानंतर आजही दुपारी औरंगाबादच्या नेत्यांची बैठक होतेय. त्यापूर्वी मनसेच्या जिल्हा संपर्क अध्यक्षांची बैठकही होणार आहे.
मनसेतील बेदिलीली कंटाळून मराठवाड्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज अखेर आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका आणि आरोप केलेत. आता यावर मनसे काय प्रत्युत्तर देणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.
मराठवाड्यातील मनसेचे एकमेव आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर मनसेला रामराम ठोकलाय. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता मात्र त्यानंतर त्यांनी हा राजीनामा मागे घेतला आहे. मात्र मनसेत पुन्हा जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या बेदिलीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच पक्षनेतृत्वावर त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीचे आरोपही केलेत. मारहाण प्रकरणानंतर पक्षातर्फे विधानसभेत हा विषय योग्य रितीनं मांडण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, जाधव यांच्या राजीनाम्याबाबत आणि आरोपांबाबत मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनही व्यक्त करण्यात आली नाही. मनसेची बैठक सुरू असून, त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मनसे काय भूमिका घेणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.