पुतण्यावरून काकांना उद्धव ठाकरेंनी सुनावले...

‘परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात ते खरे आहे पण, दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही.’ ‘म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविण्याची कल्पना कधी आम्हाला सुचली नाही.’

Updated: Jun 8, 2013, 04:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात ते खरे आहे पण, दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही.’ ‘म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविण्याची कल्पना कधी आम्हाला सुचली नाही.’ असा जबरदस्त टोला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना हाणला.

अजितदादांच्या वक्तव्यावर पवारांना सुनावले
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर रेसकोर्सच्या मुद्द्यावरून त्यांना चांगलाच चिमटा काढला होता. मात्र त्यावर उद्धव ठाकरे यांनीही रोखठोक उत्तर देत पवारांचीही चांगलीच विकेट काढली आहे. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांची उडवलेली खिल्ली याची पुन्हा एकदा आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली.

आयपीएल मॅचेस पवारांवर टीकास्त्र
शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उद्धव यांनी प्रत्युत्तर देताना असे म्हटले की ‘रेसकोर्सवरचा जुगार पाहून शरद पवारांना आयपीएलची कल्पना सुचली. पवारांना शिवाजी महाराजांच्या घोड्याचा अभिमान असेल, पण त्यांना रेसकोर्सवरच्या घोड्याचा अभिमान आहे हे ऐकून दुख: वाटले.’ असे खडे बोल उद्धव ठाकरेंनी सुनावले.

पवारांचे लवासा प्रकरण
आदिवासी आणि शेतक-यांच्या जमिनी लुटून धनदांडग्यांसाठी ‘लवासा’ उभारण्याची कल्पनाही आम्हाला कधी सुचली नव्हती, असा सडेतोड जवाब उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिला. त्यामुळे आता पवार उद्धव ठाकरेंच्या या टीकेला कसं उत्तर देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.