दोघांचं भांडण... तिसऱ्यानंच गमावला जीव

दोघांच्या भांडणात तिसऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना नागपूरातल्या योगेशनगरमध्ये घडलीय. भाडेकरु पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध शेंडे यांची हत्या करण्यात आलीय. नागपुरात गेल्या महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 28, 2012, 09:55 PM IST

www.24taas.com, नागपूर
दोघांच्या भांडणात तिसऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना नागपूरातल्या योगेशनगरमध्ये घडलीय. भाडेकरु पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध शेंडे यांची हत्या करण्यात आलीय. नागपुरात गेल्या महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.
भाडेकरु नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या घरमालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना नागपुरातल्या योगेश नगरमध्ये घडलीय. घरमालक अनिरुद्ध शेंडे यांच्याकडे सुतारकाम करणारं साकेत कुटुंब भाड्यानं राहत होतं. या साकेत कुटुंबातील नवरा बायकोत भांडण झालं. या वादात मध्यस्थी करण्यासाठी अनिरुद्ध शेंडे गेले. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या भाडेकरुचा भाऊ रामकृष्णला त्याचा राग आला. यातून सुतारकामासाठी वापरण्यात येणाऱ्या तिक्ष्ण हत्यारानं त्यानं अनिरुद्ध यांच्यावर सपासप वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्याची हत्या होण्याची नागपुरातील ही दुसरी घटना आहे. मध्यस्थी जीवावर बेतल्यानं समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.