विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मिळणं हे 'भाग्य'

2013 मध्ये कोहली संघाचा कर्णधार बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली RCB चार वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली.

Updated: Oct 13, 2021, 07:08 AM IST
विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मिळणं हे 'भाग्य' title=

मुंबई : विराट कोहलीसोबत साऊथ आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलीयर्स अनेक सामने खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला ट्रॉफी जिंकता आली नाही. सामन्यात झालेल्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराटने इंडियन प्रीमियर लीगच्या या टीमवर कोणत्या प्रकारचा प्रभाव टाकला आहे हे कधीही समजणार नाही.

विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मिळणं 'भाग्य'

फ्रँचायझीने जाहीर केलेल्या व्हिडीओमध्ये डिव्हिलियर्स म्हणाला, "विराट कर्णधार झाल्यानंतर अनेक वर्षे मी या ठिकाणी आहे आणि माझ्या मनात येणारा शब्द हा 'आभारी' आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की विराटने आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याने ज्या प्रकारे या टीमचं नेतृत्व केलं ते सर्वांना प्रेरणा देतंय. एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून अधिक चांगलं होण्यासाठी मला नक्कीच प्रेरणा मिळाली आहे. टीमवर त्याला वाटते त्यापेक्षा मोठा परिणाम झाला आहे."

कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये काय झालं?

2013 मध्ये कोहली संघाचा कर्णधार बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली RCB चार वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली. यामध्ये, गेल्या दोन सिझनव्यतिरिक्त, संघ 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने 140 सामने खेळले, त्यापैकी 66 सामन्यांमध्ये त्यांना यश मिळालं. या दरम्यान संघाला 70 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं, तर चार सामन्यांचा निकाल लागला नाही.

कामगिरीपेक्षा कोहलीचे योगदान अधिक

डिव्हिलियर्स म्हणाला की, "कर्णधार किंवा फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीपेक्षा योगदान अधिक आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याचं व्यक्तिमत्व मला माहित आहे. तुम्ही लोकांना स्वतःवर विश्वास ठेवता, जे ट्रॉफी जिंकण्यापेक्षा महत्त्वाचं आहे."