'त्या' विजयी षटकाराविषयी गौतमचं 'गंभीर' ट्विट

त्याने थेट शब्दांत आपलं मत स्पष्टपणे मांडलं.   

Updated: Apr 2, 2020, 03:23 PM IST
'त्या' विजयी षटकाराविषयी गौतमचं 'गंभीर' ट्विट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून एक इतिहास रचल्याच्या घटनेला यंदाच्या वर्षी ९  वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी म्हणजेच २ एप्रिल २०२० ला भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला नमवत क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत सोशल मीडियावर अनेकांनीच काही आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. 

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील काही क्षणांना पुन्हा उजाळा देत क्रीडा रसिकांना विश्वविजेत्या भारतीय खेळाडूंची वाहवा करण्यास सुरुवात केली. यामध्येच एका वेबसाईटच्या ट्विटने गौतम गंभीरचं लक्ष वेधलं. ज्यावर त्याने थेट शब्दांत आपलं मत स्पष्टपणे मांडलं. 

'आजच्याच दिवशी २०११ या वर्षामध्ये एका फटक्याने (शॉटने) कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली होती', असं त्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं होतं. या ट्विटने गौतम गंभीरचं लगेचच लक्ष वेधलं. त्याने यावर आपलं मतप्रदर्शनही केलं. काहीसा संतप्त आणि नाराजीचा सूर आळवत त्याने लिहिलं, 'तुम्हाला मी आठवण करु देऊ इच्छितो की, २०११ चा विश्वचषक संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ आणि सपोर्ट स्टाफने मिळून जिंकला होता. आता वेळ आली आहे की तुम्ही या षटकाराप्रती असणारं आकर्षण कमी करा.'

गंभीरच्या या ट्विटनंतर त्याचा सूर लगेचच अनेकांच्या लक्षात आला. मुळात एक खेळाडू म्हणून संघातील प्रत्येक व्यक्तीला याचं श्रेय जात असल्याची बाब त्याने यावेळी अधोरेखित केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याचंही तितकंच मोलाचं योगदान होतं. दोनीने विजयी षटकार मारत संघाला हे यश मिळवून दिलं असलं तरीही संघाच्या धावसंख्येत गौतम गंभीरने अतिशय संयमी खेळी खेळत ९७ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं, हे विसरुन चालणार नाही.