मुंबईकरांनी सावरला टीम इंडियाचा डाव, रोहितचं आणखी एक शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन मुंबईकरांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे.

Updated: Oct 19, 2019, 03:39 PM IST
मुंबईकरांनी सावरला टीम इंडियाचा डाव, रोहितचं आणखी एक शतक title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन मुंबईकरांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर २२४/३ एवढा झाला आहे. रोहित शर्मा ११७ रनवर नाबाद तर अजिंक्य रहाणे ८३ रनवर नाबाद खेळत आहे.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. ओपनर मयंक अग्रवाल १० रनवर आऊट झाला. चेतेश्वर पुजाराला खातंही उघडता आलं नाही. कर्णधार विराट कोहली १२ रनची खेळी करुन माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने २ विकेट घेतल्या, तर एनरिच नोर्टजेला १ विकेट मिळाली.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेमध्ये सध्या १८० नाबाद रनची पार्टनरशीप झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या विकेटसाठी भारताकडून ही सर्वात मोठी पार्टनरशीप आहे. 

रोहित शर्माने सिक्स मारून त्याचं शतक पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं हे ६वं शतक आहे. तर या सीरिजमधलं तिसरं शतक आहे. पहिल्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहितने शतक केलं होतं. मुख्य म्हणजे रोहित शर्माची सगळी ६ शतकं ही घरच्या मैदानात आहेत.