IPL 2019: हार्दिक पांड्याची फटकेबाजी, मुंबईचा बंगळुरूवर विजय

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ५ विकेटने शानदार विजय झाला आहे. 

Updated: Apr 15, 2019, 11:56 PM IST
IPL 2019: हार्दिक पांड्याची फटकेबाजी, मुंबईचा बंगळुरूवर विजय title=

मुंबई : बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ५ विकेटने शानदार विजय झाला आहे. बंगळुरूनं ठेवलेल्या १७२ रनचं आव्हान मुंबईने १ ओव्हर राखून पूर्ण केलं. हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईचा विजय सोपा झाला. पांड्याने १६ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. यामध्ये ५ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

बंगळुरूनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने ७ ओव्हरमध्ये ७० रन केले. पण मोईन अली बॉलिंगला आल्यानंतर मुंबईला धक्के बसायला सुरुवात झाली. रोहित शर्मा २८ रनवर आणि क्विंटन डिकॉक ४० रन करून आऊट झाला. या सुरुवातीनंतर मुंबईचा विजयाचा मार्ग सोपा असेल, असं वाटत होतं पण बंगळुरूच्या बॉलरनी मुंबईची चिंता वाढवली होती. मोईन अलीने ४ ओव्हरमध्ये फक्त १८ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहलने ४ ओव्हरमध्ये २७ रन देऊन २ विकेट घेतल्या.

मुंबईला शेवटच्या २ ओव्हरमध्ये विजयासाठी २२ रनची गरज होती. पण पवन नेगीच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने २२ रन कुटून मुंबईला एका ओव्हरने विजय मिळवून दिला.

या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. एबी डिव्हिलियर्स आणि मोईन अली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने २० ओव्हरमध्ये १७१/७ एवढा स्कोअर केला आहे. लसिथ मलिंगाच्या शेवटच्या ओव्हरमुळे बंगळुरूला मोठा स्कोअर करता आला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये मलिंगाने दोन विकेट घेतल्या तर एबी डिव्हिलियर्स रनआऊट झाला. अल्झारी जोसेफच्या दुखापतीमुळे मलिंगाने या मॅचमध्ये पुनरागमन केलं. मलिंगाचं हे पुनरागमन शानदार ठरलं. त्याने ४ ओव्हरमध्ये ३१ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला १ आणि जेसन बेहरनडॉर्फला १ विकेट मिळाली.

स्कोअरबोर्डवर १२ रन असतानाच बंगळुरूला विराटच्या रुपात पहिला धक्का लागला. तर पार्थिव पटेलही २८ रन करून आऊट झाला. यानंतर मोईन अली आणि एबी डिव्हिलियर्सने डाव सावरला. मोईन अलीने ३२ बॉलमध्ये ५० रनची खेळी केली. तर एबी डिव्हिलियर्सने ५१ बॉलमध्ये ७५ रन केले.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई १० पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. १४ पॉईंटसह चेन्नई पहिल्या आणि १० पॉईंटसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरूची टीमला ८ मॅचपैकी फक्त एकाच मॅचमध्ये विजय मिळाला असून ७ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. २ पॉईंट्सह बंगळुरूची टीम आठव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्धच्या पराभवामुळे प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या बंगळुरूच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.