'पाकिस्तानी खेळाडूंना बरा मिठ्या मारतोस', विराटने रचीन रवींद्रला शिवीगाळ केल्याने चाहते संतापले

IPL 2024, CSK vs RCB: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. विराट कोहलीने रचीन रवींद्रला शिवीगाळ केल्याने चाहते संतापले असून त्याला ट्रोल केलं जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 23, 2024, 01:09 PM IST
'पाकिस्तानी खेळाडूंना बरा मिठ्या मारतोस', विराटने रचीन रवींद्रला शिवीगाळ केल्याने चाहते संतापले title=

IPL 2024, CSK vs RCB: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चाहत्यांना विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला मैदानात एकत्र खेळताना पाहण्याची पर्वणी मिळाली. विराट कोहली मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर परतत असल्याने चाहत्यांना फार उत्सुकता होती. पण विराट कोहली अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. पण चाहत्यांना पुन्हा एकदा विराटचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. याच ओघात त्याने चेन्नईच्या रचीन रवींद्रला शिवीगाळ केली जी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर चाहते संतापले असून त्याला ट्रोल करत आहेत. 

आयपीएलचा पहिला सामना एकतर्फी झाला. चेन्नईने अत्यंत सहजपणे बंगळुरुचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना विराट कोहली प्रेक्षकांना चिअर करण्यासाठी आवाहन करत होता. चेन्नईचे विकेट्स पडावेत यासाठी विराट कोहली प्रयत्न करत होता. याचवेळी रचीन रवींद्रची विकेट पडल्यानंतर तो आक्रमक झाला आणि त्याला हात दाखवत बाहेर जाण्यास सांगू लागला. यादरम्यान त्याने अपशब्दही वापरला. 

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचीन रवींद्रचा हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. या हंगामातून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. चेन्नई संघाने 1.8 कोटीत त्याला विकत घेतलं आहे. पहिल्याच सामन्यात त्याने 15 चेंडूत 37 धावा ठोकल्या. यावेळी त्याने 3 षटकार ठोकले. क्षेत्ररक्षण करतानाही त्याने दोन जबरदस्त झेल घेतले. 

दुसरीकडे विराट कोहली मात्र मैदानावर फार चांगली कामगिरी करु शकला नाही. विराट कोहली मैदानात संघर्ष करताना दिसला. बंगळुरु संघाची स्थिती 41 वर 0 विकेट ते 72 वर 5 अशी स्थिती झाली होती. विराट कोहली 20 चेंडूत 21 धावा केल्या. अर्जून रावतच्या 48 आणि दिनेश कार्तिकच्या 38 धावांमुळे बंगळुरु संघ 173 धावसंख्या उभा करु शकला. पण दोघांनी 95 धावांची भागीदारी रचत उभारलेली धावसंख्या त्यांना विजय मिळवून देऊ शकली नाही. चेन्नईने 18.4 ओव्हरमध्येच सामना जिंकला. 

आता बंगळुरु संघ 25 मार्चला पंजाब किंग्स संघाशी भिडणार आहे. हा सामना जिंकत पहिल्या विजयाची नोंद करण्याचा बंगळुरु संघ आणि विराटचा प्रयत्न असेल.