IPL 2025 : कॅप्टन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स देणार नारळ? ऑक्शनपूर्वी 'या' चार खेळाडूंवर पलटणची नजर

Mumbai Indians In Auction : आगामी आयपीएल हंगामात (IPL 2025) हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार यावरून चर्चेला उधाण आलंय. अशातच मुंबई इंडियन्स मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 4, 2024, 07:09 PM IST
IPL 2025 : कॅप्टन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स देणार नारळ? ऑक्शनपूर्वी 'या' चार खेळाडूंवर पलटणची नजर title=
IPL 2025 mumbai indians release hardik pandya

Hardik Pandya in IPL 2025 : आयपीएल ऑक्शनपूर्वी आयपीएलचे संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. आयपीएलच्या आगामी हंगामात कसे बदल हवेत? यावर प्रखर चर्चा देखील झाली. या बैठकीत संघमालकांमध्ये मदभेद असल्याचं दिसून आलं. शाहरुख खान आणि नेस वाडिया यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं देखील समोर आलं होतं. तर मुंबई इंडियन्सकडून नीता अंबानी यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली आणि आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत. या बैठकीच्या निकषानुसार मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

अतितटीची वेळ आली तर मुंबई इंडियन्स त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला सोडण्याची शक्यता आहे. दर तीन वर्षानंतर मेगा ऑक्शन होतो, आयपीएल नियमांनुसार यंदा डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक संघाला केवळ 4 खेळाडू कायम ठेवता येणार आहे. यावर अद्याप बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, बीसीसीआयने जर रिटेन खेळाडूंची संख्या कमी केली तर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला नारळ देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. मुंबई इंडियन्स यंदा कॅप्टन देखील बदलणार का? असा सवाल विचारला जात आहे.

सर्व 10 संघांना प्रत्येकी चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल, त्यामुळे पलटण सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम संघात राखू शकतं. तर हार्दिक पांड्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह कायम आहे. मागील हंगामात पांड्याला झालेली ट्रोलिंग आणि कॅप्टन्सीमध्ये चमक दाखवता न आल्याने फ्रँचायझी कोणता निर्णय घेणार? यावर सवाल विचारला जात आहे.

दरम्यान,  हार्दिक पांड्या जर ऑक्शनसाठी आला तर लखनऊ सुपर जायएन्ट्स आणि राजस्थान रॉयल्स पांड्यासाठी बोली लावू शकतात. तर पंजाब किंग्ज देखील ऑलराऊंडरच्या शोधात आहे. पण मुंबई इंडियन्स पांड्यासाठी ऑक्शनमध्ये पुन्हा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पांड्याला एक फक्त ऑलराऊंडर म्हणून मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.

अनेक परदेशी खेळाडू आयपीएलच्या तोंडावर फ्रँचायझीकडून भलीमोठी रक्कम तर घेतात आणि राष्ट्रीय कर्तृत्वाचं नाव सांगून खेळत नाहीत. अशा खेळाडूंवर कारवाई व्हावी, असं आयपीएल फ्रँचायझींचं म्हणणं आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई व्हावीस, अशी विनंती आयपीएल संघांनी बीसीसीआयला केली आहे.