विराटची बाजू घेत गांगुली यांच्याशी कोण भिडतंय?

 बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधलाय.

Updated: Dec 24, 2021, 10:21 AM IST
विराटची बाजू घेत गांगुली यांच्याशी कोण भिडतंय? title=

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला दिलेल्या वागणूकीवर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला आहे. या मुद्द्यावरून शास्त्री यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधलाय. कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर झालेल्या गोंधळावरून रवी शास्त्री यांनी गांगुली यांच्यावर टीका केली आहे. 

यापूर्वी गांगुलीने सांगितले होते की, जेव्हा विराट कोहलीला टी-20 चे कर्णधारपद सोडायचं होतं त्यावेळी त्याने आमचं कोणाचंच ऐकलं नाही. आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण, कारण T20 आणि ODI साठी वेगळा कर्णधार नको होता. 

मात्र यानंतर विराटन गांगुलीचं विधान पूर्णपणे खोटं ठरवत सांगितलं की, त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखलं नाही. दरम्यान विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने सोडवता आला असता असं मत माजी कोच रवी शास्त्री यांनी मांडलं.

यासंदर्भात रवी शास्त्री म्हणाले, विराट कोहलीने आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला. आता बाकी सर्व गोष्टी मिटवण्याची जबाबदारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची आहे. गांगुली यांनी आपली बाजू मांडणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीने संवाद साधल्यास परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.

विराट कोहली एक सर्वोत्तम कसोटी कर्णधार असल्याचं रवी शास्त्री मानतात. शास्त्री म्हणाले, "विराटमध्ये अनेकदा मी स्वतःला पाहतो. बऱ्याच अंशी मला विराटमध्ये माझाच चेहरा दिसतो. पॅशन, काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आणि आत्मविश्वास हे सगळं मला विराटमध्ये दिसतं."