'ऋषभ पंत एक महान खेळाडू बनेल जर...', टेस्ट सीरिजपूर्वी सौरव गांगुलीने असं का म्हटलं?

बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची ही सीरिज असून पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आता ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 10, 2024, 12:18 PM IST
'ऋषभ पंत एक महान खेळाडू बनेल जर...', टेस्ट सीरिजपूर्वी सौरव गांगुलीने असं का म्हटलं?  title=
(Photo Credit : Social Media)

Gourav Ganguli About Rishabh Pant : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची ही सीरिज असून पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार दुर्घटनेनंतर ऋषभ पंत जवळपास दीड वर्ष क्रिकेटपासून दूर होता, मात्र आता तो बरा झाला असून त्याला टीम इंडियाकडून टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची संधी सुद्धा देण्यात आली होती. आता ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.  19 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतला टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये सामील करण्यात येईल हे जवळपास निश्चित आहे. 

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने एका कार्यक्रमात म्हटले की, "मी ऋषभ पंतला भारताचा सर्वश्रेष्ठ टेस्ट फलंदाजांपैकी एक मानतो. त्याचे टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले याविषयी मला आश्चर्य वाटत नाही. तो भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये खेळतं राहील. जर तो अशाच प्रकारे प्रदर्शन करत राहिला तर तो टेस्ट क्रिकेटमधल्या महान खेळाडूंच्या लिस्टमध्ये सामील होईल. मला वाटतं की त्याने छोट्या फॉरमॅटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करायला हवी. तो टॅलेंटेड आहे आणि मला विश्वास आहे की तो लवकरच हे करू शकेल. 

गांगुलीने म्हंटले की, " मला माहित आहे की मोहम्मद शमी दुखापतीच्या कारणामुळे टीममध्ये नाहीये परंतु लवकरच तो पुनरागमन करेल कारण भारताला ऑस्ट्रेलिया दौरा करायचा आहे. भारताचा अटॅक सुद्धा आता खूप चांगला असून मी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची वाट पाहत आहे. भारतीय टीमसाठी तेथे चांगले आव्हान असेल. यानंतर टीम थेट जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि हे दोन्ही दौरे खूप महत्वाचे आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यामुळे भारताच्या वेगवान गोलंदाजांचे आक्रमण मजबूत राहील. 

सौरव गांगुलीने म्हटले की, " पाकिस्तानला त्यांच्याच होम ग्राऊंडमध्ये हरवणं सोपं नाही म्हणून बांगलादेश टीमचे मी अभिनंदन करतो. परंतू भारतीय टीम ही वेगळ्या प्रकारची असून ते होम ग्राउंडवर आणि परदेशात सुद्धा उत्तम परफॉर्मन्स देतात. मला वाटतं नाही की बांगलादेश इथे जिंकू शकेल. भारत ही सिरीज जिंकेल. परंतु भारताला बांगलादेशकडून मोठ आव्हान मिळू शकतं कारण त्यांनी आताच पाकिस्तानला हरवलंय. पाकिस्तानला हरवून ते आत्मविश्वासाने इथे येतायत. 

बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया : 

 रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

 

टीम इंडियाचं वेळापत्रक : 

बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिली टेस्ट चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.