विराट कोहलीला कॅप्टन पदावरुन हटवल्यानंतर सौरव गांगुली यांचं मोठ वक्तव्य

विराटने एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर जवळपास 24 तासांनंतर सौरव गांगुली यांनी सांगितले...

Updated: Dec 9, 2021, 07:31 PM IST
विराट कोहलीला कॅप्टन पदावरुन हटवल्यानंतर सौरव गांगुली यांचं मोठ वक्तव्य title=

मुंबई : भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची हकालपट्टी करण्यात आली आणि त्याच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह विराट आता केवळ कसोटी संघाचा कर्णधार आहे. रोहित यापूर्वीच टी-20चा कर्णधार झाला होता आणि आता त्याच्याकडे वनडेचीही जबाबदारी आली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे एक मोठं वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी विराट कोहलीजवळ काय भविष्यवाणी केली होती हे समोर आले आहे.

विराटने एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर जवळपास 24 तासांनंतर सौरव गांगुली यांनी सांगितले की, निर्णयानंतर ते आणि निवडकर्ते कोहलीशी बोलले होते. कर्णधारपदाच्या कार्यकाळासाठी कोहलीचे आभारही मानले. मात्र, गांगुलीने दावा केला आहे की, त्यांनी कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. पण त्याने ते ऐकले नाही.

गांगुलीचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा बोर्डाने कोहलीला कोणतीही माहिती न देता कर्णधारपदावरून हटवले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आयसीसी स्पर्धा न जिंकल्यामुळे कोहलीवर कर्णधारपद सोडण्याचा दबाव असल्याचीही चर्चा आहे.

टी-20 कर्णधारपद सोडताना कोहलीने सांगितले होते की, वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. तेव्हा बीसीसीआयनेही या निर्णयाचा आदर केला होता.

गांगुली म्हणाले- T20 सोडण्यापासून रोखले होते

आता एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सौरव गांगुली म्हणाले , हा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी संयुक्तपणे घेतला आहे. खरं तर, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, पण त्याने ती मान्य केली नाही आणि मग निवडकर्त्यांनी विचार केला की, मर्यादित ओव्हरमध्ये क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असू नयेत. त्यामुळे विराटला त्या पदावरुन काढण्यात आले. आता विराट कसोटी कर्णधारपदी कायम राहणार आणि तर रोहित वनडे-टी-20 ची कमान सांभाळणार आहे.

T20 कर्णधारपद सोडल्यानंतर गांगुली काय म्हणाले?

टी-20 विश्वचषकापूर्वी कोहलीने कर्णधारपद सोडले होते, त्यावर गांगुली म्हणाले की, कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्याने मला आश्चर्य झाला. गांगुली पुढे म्हणाले, "हा त्याचा (कोहलीचा) निर्णय आहे. आमच्या बाजूने कोणताही दबाव नव्हता. आम्ही त्याला काहीच सांगितले नाही. आम्ही असे काही करत नाही कारण मी देखील एक खेळाडू आहे, त्यामुळे मला समजते. तिन्ही फॉरमॅटमध्ये इतके दिवस कर्णधार राहणे अवघड आहे. मी सहा वर्षे कर्णधार होतो. आदर मिळतोय हे बाहेरून बरं वाटतंय. पण आत तुम्हाला त्रास होत असतो, ते कोणत्याही कर्णधाराला होऊ शकते. हे एक कठीण काम आहे."