T20 WC : नामीबियाच्या विजयाने वाढले भारतीय संघाचे टेंशन; समजून घ्या गणित

श्रीलंकेच्या संघाला नामिबिया इतक्या सहजासहजी पराभूत करेल असे कुणालाही वाटले नव्हते

Updated: Oct 17, 2022, 12:04 PM IST
T20 WC : नामीबियाच्या विजयाने वाढले भारतीय संघाचे टेंशन; समजून घ्या गणित title=

T20 World Cup 2022 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरू झाला आहे आणि पहिल्याच सामन्याने स्पर्धेला मोठं वळण लागलं आहे. श्रीलंकेला (sri lanka) पहिल्या सामन्यात नामिबियाविरुद्ध (namibia) पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आशिया चषक (Asia Cup) जिंकणाऱ्या श्रीलंकन ​​संघाच्या (sri lanka) या पराभवाने या मेगा स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला हलक्यात घेण्याची चूक कोणताही संघ करू शकत नाही हे दाखवून दिले आहे. श्रीलंकेच्या या पराभवामुळे एकप्रकारे भारतीय संघाच्याही (Team India) अडचणीही वाढल्या आहेत. 

पहिल्या सामन्यात नामिबियाच्या संघाने अलीकडेच आशियाई चॅम्पियन बनलेल्या श्रीलंकेच्या संघाचा 55 धावांनी पराभव केला. फॉर्मात असलेल्या श्रीलंकेच्या संघाला नामिबिया (namibia) इतक्या सहजासहजी पराभूत करेल असे कुणालाही वाटले नव्हते. श्रीलंकेच्या (sri lanka) या पराभवामुळे उर्वरित संघांचा विशेषतः भारतीय संघाचा मार्ग थोडा कठीण झाला आहे. टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) फॉरमॅटनुसार, ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये चार-चार संघ आहेत आणि या आठ संघांमधून फक्त दोन संघ सुपर-12 मध्ये पोहोचतील.

सुपर-12 चे आठ संघ आधीच ठरलेले आहेत, तर उर्वरित चार संघांना त्यासाठी पात्र व्हावं लागणार आहे. श्रीलंका, वेस्ट इंडिज, नेदरलँड्स, नामिबिया, यूएई, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांतील केवळ चार संघ सुपर-12 साठी पात्र ठरतील. ग्रुप ए मधील पहिल्या क्रमांकावर असलेला संघ आणि ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांवरील संघ ग्रुप -1 मध्ये जाईल.  ग्रुप-1 मध्ये सध्या अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे आधीच उपस्थित आहेत. तसेच ग्रुप ए मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि  ग्रुप बी मधील पहिल्या क्रमांकाचा संघ ग्रुप-1 मध्ये पोहोचेल.

श्रीलंकेचा पराभव म्हणजे वेस्ट इंडिज आणि श्रीलंका भारताच्या ग्रुप 2 मध्ये सामील होतील आणि त्यामुळे डेथ ऑफ ग्रुप बनतील.  ग्रुप बी मध्ये वेस्ट इंडिज अव्वल राहिल्यास आणि ग्रुप ए मध्ये श्रीलंका दुसऱ्या स्थानावर राहिल्यास श्रीलंका आणि वेस्ट इंडिज भारताच्या गटात पोहोचतील आणि ग्रुप 2 हा स्पर्धेतील ग्रुप ऑफ डेथ होईल. या गटात आधीच पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश असे संघ आहेत आणि त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे संघ सामील होतील. त्यानंतर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील पहिल्या क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा परिस्थितीत भारतासाठी सेमीफायनलचा रस्ता सोपा नाहीये.