हो...शक्य आहे...; WTC Final भिडणार भारत विरूद्ध पाकिस्तान?

गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय तर नोंदवला

Updated: Jul 21, 2022, 12:12 PM IST
हो...शक्य आहे...; WTC Final भिडणार भारत विरूद्ध पाकिस्तान? title=

मुंबई : गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय तर नोंदवलाच. पण दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनाही आनंद झाला. या विजयाने पाकिस्तानला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत केवळ तिसऱ्या स्थानावर नेलं नाही तर भारतीय टीमला चौथ्या स्थानावर ढकललंय.

सध्या, पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 58.33 आहे तर भारत 52.08 टक्क्यांसह पाकिस्तानपेक्षा मागे आहे. 71.43 टक्के गुणांसह दक्षिण आफ्रिका अव्वल तर ऑस्ट्रेलिया 70 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

टेबलवरील अव्वल दोन संघ पुढील वर्षी WTC फायनल्समध्ये भाग घेतील. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान पहिल्या दोन स्थानांमध्ये नाहीत. परंतु हे दोन्ही संघ अंतिम फेरीत खेळताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अब्दुल्ला शफीकच्या शतकी खेळीने कसोटी क्रिकेटमधील भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा कसोटी सामना 2007 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून दोन्ही टीम केवळ मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतायत. त्यापैकी बहुतेक सामने फक्त ICC स्पर्धांमध्ये आहेत. 

कसं आहे समीकरण?

टीम इंडियाला बांगलादेशच्या दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळणार आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान न्यूझीलंड आणि इंग्लंडचे घरच्या मैदानावर यजमानपद भूषवणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही टीम्सना आपापली मालिका जिंकावी लागेल. 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव होईल आणि त्यानंतर पुढील कसोटी मालिकेतही आफ्रिकन टीम हरेल आणि असं झाल्यास भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम फेरीत आमनेसामने येतील अशी आशा दोन्ही टीम्सना असेल पण यावेळी स्वरूप वेगळं असेल.