Virat Kohli has retired from T20I cricket : साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकताच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार विराट कोहली याने मोठी घोषणा केली. हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे, असं विराट कोहली फायनलनंतर बोलताना म्हणाला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरलं गेलंय. विराटने असा निर्णय का घेतला? यावर देखील त्याने उत्तर दिलंय.
सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने बोलताना चाहत्यांना धक्का दिला. हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता. पराभव झाला असता तरी मी निवृत्ती जाहीर केली असती. आता पुढच्या पिढीच्या हातात जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी बराच वेळ लागला. कारण रोहितला नऊ वर्ल्ड कप वाट पाहावी लागली, माझा तर हा सहावाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे रोहित शर्मा वर्ल्ड कपसाठी खऱ्या अर्थाने पात्र होता, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.
भारताकडून खेळणारा हा माझा शेवटचा टी-20 सामना होता. आम्हाला तो कप उचलायचा होता आणि आम्ही ते करून दाखवलं. मी कोणत्या प्रकारच्या मानसिकता आहे, हे मला माहीत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मला फारसा आत्मविश्वास नव्हता. पण आम्ही करून दाखवलं, असं विराट म्हणाला.