टीम इंडियाचा कप्तान म्हणून रोहितच्या नावाला हा पर्याय योग्य होता का?

रोहितला कर्णधार बनवल्यानंतर माजी खेळाडूने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Updated: Nov 10, 2021, 03:03 PM IST
टीम इंडियाचा कप्तान म्हणून रोहितच्या नावाला हा पर्याय योग्य होता का? title=

मुंबई : टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुपच्या सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडलं. तर विराट कोहलीनंतर कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मात्र रोहितला कर्णधार बनवल्यानंतर माजी खेळाडूने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रोहित शर्माला कर्णधार बनवण्यावर प्रश्न उपस्थित 

इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने रोहित शर्माच्या भारताचा नवा T20 कर्णधार म्हणून केलेल्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ग्रॅमी स्वानच्या मते, रोहित शर्माला कर्णधारपद द्यायला नको होते. 

ग्रॅमी स्वान म्हणाले की, रोहित शर्माचे वय लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याला नव्हे तर युवा फलंदाज ऋषभ पंतला भारताचा कर्णधार बनवायला हवं होतं. 

हा खेळाडू बनू शकला असता उत्तम कर्णधार

एका बेवसाईटशी बोलताना ग्रॅम स्वान म्हणाला, "रोहित चांगला आहे, पण जास्त काळ भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवू शकत नाही. तर ऋषभ पंत पुढील 10 वर्षांसाठी ही जबाबदारी घेऊ शकतो.' 

ग्रॅम म्हणतात, "ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अप्रतिम कामगिरी केलीये. त्याने आपल्या खेळाचा स्तर उंचावला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोघांच्याही छटा त्याच्यामध्ये दिसून येतात. याशिवाय ऋषभ पंत विराटसारखाच जोशपूर्ण आहे."

IPLमध्ये केलीये कमाल

या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाल्याने पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. ऋषभ पंतने या संधीचा चांगला फायदा करून दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफपर्यंत नेलं. पंत सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्थान मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.