मोदींवरुन टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तान्यांवर भारतीयांची 'ट्रोलधाड'! म्हणाले, 'तुम्हाला पंतप्रधान तरी...'

World Cup 2023 Ind vs Aus : भारताच्या पराभवानंतर एकीकडे चाहत्यांनी अपार दुःख व्यक्त केलय. तर दुसरीकडे भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने तर थेट पंतप्रधानांना यामध्ये खेचलं आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 20, 2023, 12:33 PM IST
मोदींवरुन टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तान्यांवर भारतीयांची 'ट्रोलधाड'! म्हणाले, 'तुम्हाला पंतप्रधान तरी...' title=

World Cup 2023 Ind vs Aus : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र ज्या दिवसाची भारतीय क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते त्याच दिवशी त्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत. भारताच्या पराभवानंतर स्टेडिअमवर भयाण शांतता पसरली होती. अशातच आता शेजारच्या पाकिस्तानातून भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु आहे. यामध्ये पाकिस्तानातील पत्रकार देखील मागे नाहीत.

हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावलेली होती. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी पॅट कमिन्सला आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्डकप 2023 सुपूर्द केला. भारतीय संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. देश आज आणि नेहमीच संघासोबत उभा आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट संघाने संपूर्ण स्पर्धेत देशाला खूप अभिमान वाटला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार असल्याचे समोर आलं होतं. विजेत्या संघाला ट्रॉफी पंतप्रधानच ट्रॉफी देणार असल्याचेही समोर आलं होतं. पण सामना सुरु झाल्यानंतर बराच काळ पंतप्रधान मोदी स्टेडिअमध्ये दिसत नव्हते. गृहमंत्री अमित शहा पहिल्या डावात दिसले. त्यानंतर दुसऱ्या डावाच्या शेवटी जेव्हा भारताचा पराभव जवळ आला होता त्यावेळ पंतप्रधान मोदी स्टँडमध्ये बसलेले दिसले. ते हसत हसत जनतेला हात दाखवत होते. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना वर्ल्डकप देण्यात आला.

दुसरीकडे, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानात वेगळ्याच प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आलं. पाकिस्तानी पत्रकार एहतशाम उल हक यांनी भारताचा सामना हरताना पाहताना एक पोस्ट केली आहे. निदान आपल्या पंतप्रधानांसमोर तरी आपण हरलो नाही, अशी पोस्ट पत्रकार एहतशाम उल हक यांनी केली आहे.

पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच एहतशाम उल हक यांना इतिहास देखील सांगितला आहे. नेटकऱ्यांना त्यांना 2011 च्या उपांत्य फेरीची आठवण करून दिली ज्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही देशांचे प्रमुख डॉ. मनमोहन सिंग आणि युसूफ रझा गिलानी हे प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला होता. मोहाली येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान गिलानी यांनी त्यांच्या संघाला पराभूत होताना पाहिले होते.

दुसऱ्या एका युजरने 'तुमचे पंतप्रधान तर तुरुंगात आहेत' अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने तर तुमच्याकडे पंतप्रधान आहेत का? असा सवाल केला आहे. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहेत. मे महिन्यात इम्रान खान यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.