अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एक्स अकाऊंटवरील ब्लू टिक काढल्यानं रोहित पवार संतप्त

Rohit Pawar on Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितनं टोलमाफीच्या मुद्यावर वक्तव्य केलं असून त्यानंतर तिचं ट्विटरवरील ब्लू टिक काढूण टाकण्यात आल्याचे पाहता रोहित पवारांनी संतप्त भूमिका घेतली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 11, 2023, 04:59 PM IST
अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एक्स अकाऊंटवरील ब्लू टिक काढल्यानं रोहित पवार संतप्त title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Pawar on Tejaswini Pandit : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच टोलमाफीबाबत एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर सगळीकडे आपल्याला वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान, टोलमाफीच्या मुद्यावर आता लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं थेट त्यावर वक्तव्य केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला आहे.

संतापले रोहित पवार  

तेजस्विनीच्या एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक काढून टाकल्यानंतर आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत रोहित पवार म्हणाले, 'विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु  सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?'. 

हेही वाचा : ...अन् गौरव मोरेला लंडनला विमातळावरच अडवलं; 'या' वक्तव्यामुळे फसला होता 'फिल्टर पाड्याचा बच्चन'

काय म्हणाली होती तेजस्विनी पंडित

'कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!' असं तेजस्विनी तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.