अन्नपदार्थांचं 'हे' कॉम्बिनेशन ठरू शकतं धोकादायक; पाहा आयुर्वेदात काय म्हटलंय

जेवताना खास करून कॉम्बिनेशनसंदर्भात आयुर्वेदाचे महत्त्वाचे नियम आहेत जे पाळले गेले पाहिजेत.

Updated: Apr 8, 2022, 03:56 PM IST
अन्नपदार्थांचं 'हे' कॉम्बिनेशन ठरू शकतं धोकादायक; पाहा आयुर्वेदात काय म्हटलंय title=

मुंबई : निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार घेणं फार गरजेचं असतं. मात्र जेव्हा आपण काहीही खातो त्यावेळी खाण्याचं कॉम्बिनेशन महत्त्वाची भूमिका बजावतं. अनेकदा आपण जेवताना खाण्याच्या कॉम्बिनेशनकडे लक्ष देत नाही. मात्र आयुर्वेदात नमूद केल्याप्रमाणे, जेवताना खास करून कॉम्बिनेशनसंदर्भात असे अनेक महत्त्वाचे नियम आहेत जे पाळले गेले पाहिजेत.

दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, चुकीचं फूड कॉम्बिनेशन शारीरिक तसंच मानसिक आरोग्यासाठी घातक ठरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे.

आयुर्वेदानुसार इतर खाद्यपदार्थाबरोबर फळ खाणं चुकीचे मानलं जातं. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे ते लवकर पचतात. प्रथिनं आणि स्टार्च समृध्द अन्नपदार्थांना अधिक पचनाची आवश्यक असते. म्हणून, जर तुम्ही जेवणानंतर फळ खाल्लं तर पचन होणं कठीण होतं. त्यामुळे तुम्हाला पोषक तत्त्वही मिळणार नाहीत.

आयुर्वेदानुसार, दूध आणि केळं हे यांचं सेवन एकत्र करू नये. त्यांचं सेवन केल्याने शरीरात टॉक्सिन निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला केळी आणि दुधाची स्मूदी प्यायला आवडत असेल तर वेलची आणि जायफळ घाला. याशिवाय ते पचवणं अवघड होऊ शकतं.

जेवणावेळी किंवा जेवणाच्या त्वरित नंतर कोल्ड्रिंक, आईस्क्रीम किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं दही खाल्ल्याने पाचन शक्ती कमी होते. (ज्याला अग्नी म्हणतात). यामुळे पाचक समस्या, एलर्जी आणि सर्दी होण्याचा धोका वाढतो.