अमित शाह-स्मृती इराणींनी राहुल गांधीवर केलेले १० हल्ले!

राहुल गांधी गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा उभी करण्याचा लागोपाठ प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या सभेंमधून त्यांनी भाजपवर आणि त्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली.

Updated: Oct 10, 2017, 03:47 PM IST
अमित शाह-स्मृती इराणींनी राहुल गांधीवर केलेले १० हल्ले! title=

नवी दिल्ली : राहुल गांधी गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा उभी करण्याचा लागोपाठ प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या सभेंमधून त्यांनी भाजपवर आणि त्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली.

आता भाजपने राहुल गांधी यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचा गड असलेल्या अमेठीत सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी अमेठीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, स्मृती इराणी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २१ योजनांची घोषणा करत विकासाला गती देण्याचे म्हटले आहे. 

याआधी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचार केला होता. पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतरही त्या अमेठीत सक्रिय आहेत. आणि जम बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या योजनांची सुरूवात याचाच भाग आहे. या सभेतून अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ले केले. 

शाह आणि इराणी यांच्या भाषणातील १० मुद्दे -

- स्मृती इराणी या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला करत म्हणाल्या की, ‘जे देशभरात विकासावर भाषण देत आहेत, ते अमेठीचा विषय निघाला की, गप्प बसतात’.

- इराणी पुढे म्हणाल्या की, ‘राहुल यांनी गुजरातमध्ये जाऊन विकासाची खिल्ली उडवली. इथे त्यांच्यात कार्यक्षेत्रात ते विकास करू शकले नाहीत. त्या हेही म्हणाल्या की, राहुल हे अमेठीकडे भार म्हणून पाहतात.

- इराणी अमेठीबाबत बोलताना म्हणाल्या की, इथे जे गेल्या ७ वर्षात झालं नाही, ते गेल्या सहा महिन्यात झालंय. 

- अमित शाह म्हणाले की, ‘मी ३५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. पण मी कधीही नाही पाहिलं की, इथून विजयी झालेला व्यक्ती अमेठीत आलाच नाही. तर पराभूत झालेले लोक अमेठीला मिठी मारत काम करत आहेत’.

- शाह पुढे म्हणाले की, ‘मला राहुल गांधींना विचारायचं आहे की, तुमच्या तीन पिढ्यांना अमेठीतील जनतेने मत दिले. आता ते लोक तुमच्याकडून हिशोब मागत आहेत’.

- शाह म्हणाले की, ‘राहुल इतक्या दिवसांपासून इथले सांसद आहेत. पण इथे कलेक्ट्रेट, टीबी रूग्णालय का नाहीये? 

- अमित शाह म्हणाले की, अमेठी गांधी-नेहरू परिवारासाठी व्हिआयपी क्षेत्र आहे. स्वातंत्र्यापासून मोठमोठे दिग्गजांना अमेठीतून निवडून दिलंय. योगी आदित्यनाथ यांचे सरकार येण्याआधी इथे विकास करण्यासाठी काय झालंय?

- शाह यांनी कॉंग्रेसच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत विचारले की, ‘विकासाचे दोन मॉडल आहेत. एक गांधी-नेहरू आणि दुसरा मोदी मॉडल’.

- राहुल गांधींवर टीका करत शाह म्हणाले की, ‘पंजोबा, आजी आणि वडील सत्तेत होते, विकास का झाला नाही?’

- अमित शाह म्हणाले की, ‘या पक्षाने देशाला असे पंतप्रधान दिले जे इशा-यावर बोलत होते. पण आम्ही देशाला बोलणारा पंतप्रधान दिला’.