...म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट, 'RSS आणि भाजपा...'

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव टीका केली असून, अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2024, 03:07 PM IST
...म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट, 'RSS आणि भाजपा...' title=

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर जाहीर केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने 22 जानेवारीचा कार्यक्रम पूर्ण राजकीय नरेंद्र मोदी कार्यक्रम केला आहे. हा भाजपा, आरएसएसचा कार्यक्रम असल्यानेच काँग्रेस अध्यक्षांनी जाण्यास नकार दिला आहे असं मला वाटतं," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

"आम्ही सर्व प्रकारचे धर्म आणि प्रथांसाठी खुले आहोत. हिंदू धर्मातील सर्वात वरिष्ठ असणाऱ्यांनाही 22 जानेवारीच्या कार्यक्रमाबद्दल आपलं मत जाहीरपणे मांडलं आहे. हा एक राजकीय कार्यक्रम असल्याचं ते म्हणाले आहेत", असं राहुल गांधींनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "याामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या भोवती रंगवण्यात आलेल्या या राजकीय कार्यक्रमाला हजेरी लावणं आमच्यासाठी थोडं कठीणच आहे".

'काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारलं'

बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं होतं. काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प असल्याचं म्हटलं आहे. या मंदिरामागे भाजपाचा वैयक्तिक हेतू असल्याचा त्यांचा आरोप आहे. पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी भाजपा आणि आरएसएस नेत्यांकडून अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा कऱण्यामागील हेतूची विचारणा केली आहे. 

22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य पाहुणे असणार आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारचे अधिकारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यग्र आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडाआधी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पाहुण्यांना निमंत्रण पाठवलं जात आहे. 

मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकची वेळ दुपारी 12.20 वाजता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे 12:20 वाजता कार्यक्रम सुरू होईल. सर्व विधी वाराणसीचे लक्ष्मीकांत दीक्षित करणार आहेत. प्राणप्रतिष्ठेचा विधी उद्यापासून म्हणजेच 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21जानेवारीपर्यंत पूजा विधी चालणार आहे. मंदिरात रामाच्या बालरूपाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले की, 18 जानेवारी रोजी गर्भगृहात रामलल्लाची स्थापना करण्यात येईल. मूर्तीचे वजन 120 ते 200 किलोपर्यंत असेल. 18 जानेवारी रोजी पुतळा पादुकावर ठेवला जाईल. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिरात स्थापनेसाठी म्हैसूर येथील अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाची नवीन मूर्ती निवडण्यात आली आहे. सध्याची रामललाची मूर्तीही नवीन मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.