मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पला लागला ब्रेक! काय आहे कारण ते जाणून घ्या

 मुंबई - अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.  

Updated: Sep 5, 2020, 08:11 AM IST
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पला लागला ब्रेक! काय आहे कारण ते जाणून घ्या  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असणाऱ्या मुंबई - अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे, भूसंपादनाच्या कामास यावर्षी उशीर झाला आहे. त्याचा थेट परिणाम प्रकल्पावर होत आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. याच्या माध्यमातून देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात त्यांनी जपानला सहभागी करुन घेतले आहे. या प्रकल्पासाठी ६३ टक्के जमीन अधिग्रहण करत ती ताब्यात घेतली आहे. यामध्ये गुजरातमधील सुमारे ७७ टक्के, दादर नगर हवेलीमध्ये ८० टक्के आणि महाराष्ट्रातील २२ टक्के लोकांचा समावेश आहे.

अद्याप ९ निविदा उघडल्या जाऊ शकल्या नाहीत

महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी यासारख्या क्षेत्रात भूसंपादनासंदर्भात अजूनही काही अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी पालिकेने सार्वजनिक कामांच्या ९ निविदांना आमंत्रित केले होते. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे या निविदा उघडण्यात आलेल्या नाही. त्यामुळे येथील काम रखडले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.