मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या - उच्च न्यायालय

देशभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.  

Updated: Dec 2, 2020, 03:17 PM IST
मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या - उच्च न्यायालय  title=

अहमदाबाद : देशभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ (Covid-19) पासून बचावासाठी लोकांना मास्क (Mask) वापरणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परंतु असे असूनही लोक नियमांचे पालन करीत नाहीत आणि मास्क न घालता फिरत राहतात. अशा परिस्थितीत आता गुजरात उच्च न्यायालयाने  (Gujarat High Court) अशा लोकांना अनोख्या शिक्षेचे आदेश दिले आहेत.

कोविड सेंटरमध्ये काम करावे लागेल

गुजरात उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत राज्य सरकारला आदेश दिला आहे की, राज्यात जे लोक विना मास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये १० ते १५ दिवसांची ड्यूटी देण्यात यावी. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. दरम्यान, ही शिक्षा नियमभंग करणाऱ्या व्यक्तीचे वय, पात्रता, लिंग यानुसार ठरवली जाणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील कार्य अहवाल २४ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

कोरोना सेंटरमध्ये काय असणार काम

गुजरात उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'जर एखाद्याने मास्क न घालता फिरताना आढळून आला तर त्याला कोविड कम्युनिटी सेंटरमधील बिगर वैद्यकीय विभागात ०१-१५ दिवस काम करण्याची जबाबदारी देण्यात यावी. जर लोक कोविड कम्युनिटी सर्व्हिस सेंटरला सेवेसाठी पाठवित असतील तर दिवसभर ते सतर्क राहतील आणि मास्क घालतील. दिवसांतून चार ते पाच तास त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. नियमभंग केलेल्या नागरिकांकडून कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, जेवण तयार करणे, मदत करणे, सेवा करणे, कोविड केंद्रातील इतर कामे, त्याचबरोबर माहिती तयार संकलित करण्याची कामे करून घेतली जाणार आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचे १४८८५ रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये आतापर्यंत २ लाख ११ हजार २५७ लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यापैकी ४००४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील कोविड -१९ (Covid-19)पासून आतापर्यंत १ लाख ९२ हजार ३६८ लोक बरे झाले आहेत आणि राज्यात १४ हजार ८८५ सक्रिय रुग्ण आहेत.