पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी

पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय नाट्य पाहायला मिळतं आहे

Updated: Feb 4, 2019, 12:35 PM IST
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी राज्यपालांना केल्या आहेत. या अहवालानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यपाल त्रिपाठी यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पाचारण केलं आहे. 

शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी तपास करण्यासाठी रविवारी संध्याकाळी सीबीआयचे पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलं. बंगाल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्यरात्री त्यांची सूटका केली. यानंतर कोलकाता पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दाखल झाल्या. सध्या मोदी सरकारविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन करत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी संविधान बचाव नावाने धरणं आंदोलन पुकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुडाचं राजकारण करत असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सांगण्यावरुन सीबीआयनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप, ममता बॅनर्जींनी केला. यामुळे पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद आणखी चिघळला आहे.