पंजाबनंतर छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये खटके; 25 आमदार पोहचले दिल्लीत

 पंजाब कॉंग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर आता छत्तीसगडमध्ये देखील राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

Updated: Oct 2, 2021, 10:59 AM IST
पंजाबनंतर छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये खटके; 25 आमदार पोहचले दिल्लीत title=

नवी दिल्ली : कॉंग्रस पक्षासमोरील अडचणी वाढतच आहेत. पंजाब कॉंग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर आता छत्तीसगडमध्ये देखील राजकीय वादाला तोंड फुटले आहे. छत्तीसगडचे 25 कॉंग्रेस आमदार दिल्लीत पोहचले आहेत. सर्व आमदारांनी कॉंग्रेस हायकमांडच्या भेटीची मागणी केली आहे. हे सर्व आमदार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे जवळचे मानले जात आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत पोहचलेले छत्तीसगड कॉंग्रेसचे आमदार हे राज्यातील संभावित राजकीय बदलांच्या विरोधात आहेत. 2018 साली विधानसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने 90 मधून 67 जागा मिळवल्या होत्या. पूर्ण बहुमत असलेल्या सरकारमध्ये तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी दोन प्रमुख दावेदार होते. एक भूपेश बघेल आणि दुसरे टीएस सिंह होय.

कॉंग्रेस हायकमांडने तेव्हा अडिच अडिच वर्षांचे मुख्यमंत्री बनन्याचा फॉर्मुला निश्चित केला होता. आता भूपेश बघेल यांचा अडिच वर्षाचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर टीएस सिंह यांना मुख्यमंत्रीपद मिळणे अपेक्षित आहे. परंतु इथेच राजकीय तिढा निर्माण झाला आहे. आता अंतिम निकाल कॉंग्रेस हायकमांडच्या हातात आहे.

त्यामुळे कॉंग्रेस आमदारांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. दिल्लीत सध्या 25 आमदार पोहचले आहेत. येत्या दिवसांत छत्तीसगडमध्येही काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.