'मी आता..' मलायकाच्या वडिलांनी केलेला 'तो' फोन; पालकांच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्याल?

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 12, 2024, 12:37 PM IST
'मी आता..' मलायकाच्या वडिलांनी केलेला 'तो' फोन; पालकांच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्याल? title=

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी राहत्या घरी उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आत्महत्येपूर्वी त्यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन केला होता. या दोघींशी त्यांनी शेवटचा संवाद साधला

अद्याप अनिल मेहता यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसलं तरीही ते आजाराने कंटाळले होते किंवा त्यांना जीवनात नैराश्य आल्याच्या चर्चा सुरु होता. पण अनिल मेहता यांची पत्नी जॉस यांनी या सगळ्या चर्चा आणि कारणे फेटाळली आहेत. यावरुन पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की, अनिल मेहता यांनी आत्महत्या का केली. अनिल मेहता यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. असं काय कारण होतं ज्यामुळे त्यांना इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. 

पालकांचा एकटेपणा

एका ठराविक वयानंतर पालक थकतात आणि त्यांना नैराश्य येत असल्याच अनेक उदाहरणातून समोर आलं आहे. अशावेळी पालकांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचा देखील विचार करणे तितकंच महत्त्वाचं आहे. स्पिरिच्युअल एनर्जी हिलर वनश्री पांडे यांनी पालकांच्या नैराश्याची काही कारणे आणि त्यावरील उपाय देखील सांगितले आहेत. 

स्पर्श 

पालक आणि मुलांचं नातं हे अतिशय घट्ट नातं असतं. पण एका वयानंतर दोघांमध्ये स्पर्श ही भावना राहत नाही. मुलं मोठी होतात तशी ती पालकांपासून थोडी दूर राहतात. अशावेळी पालकांना मुलांचा स्पर्श महत्त्वाचा वाटतो. लहान मुलांना आई-वडिल मिठीत घेतात पण या गोष्टी मोठं झाल्यावर मागे पडतात. अशावेळी मुलांनी पालकांना स्पर्श करावा. जसे की, हात-पाय दाबून देणे, आईला वडिलांना मिठी मारणे. 

संवाद 

पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. हल्ली मुलं पालकांपासून दूर राहतात. कधी शिक्षण तर कधी विभक्त कुटुंब पद्धत, पण असं असलं तरीही मुलांनी पालकांशी संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. हल्ली व्हिडीओ कॉल किंवा स्काईपद्वारे मुलं पालकांशी संवाद साधू शकतात. एका शहरात असलात तर पालकांना आठवड्यातून किमान दोनदा तरी भेटा. लांब राहत असाल तर मुलांनी पालकांसोबत खास व्हॅकेशन प्लान करा. किंवा त्यांना सरप्राईज पिकनिक भेट म्हणून द्या. 

सण साजरे करा 

मुलांनी पालकांसोबत खास सण साजरे करा. अनेक पालक जुन्या चालिरिती, परंपरा जपणारे असतात. अशावेळी मुलांनी त्यांच्यासोबत खास क्षण साजरे केले तर पालकांसाठी तो खास क्षण असते. सण वार किंवा गेट टू गेदर एकत्र साजरे करा. पालकांचा एकटेपणा कसा दूर येईल याची काळजी घ्या. संवाद साधा. त्यांचे छंद जोपाण्यास मदत करा.