अजित पवारांना क्लीन चीट देण्याचा निर्णय सरकारचा नाही- दानवे

'महाराष्ट्राचे दोन लालू, पवार-तटकरे जेलमध्ये घालू' असा आवाज भाजपने उठवला होता.

Updated: Nov 25, 2019, 06:06 PM IST
अजित पवारांना क्लीन चीट देण्याचा निर्णय सरकारचा नाही- दानवे  title=

मुंबई : सिंचन घोटाळ्याशी संबंधित ९ प्रकरणांच्या चौकशांच्या फाइली बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. अजित पवारांना तुरुंगात टाकण्याच्या आश्वासनावर भाजप सरकार सत्तेत आले होते. 'महाराष्ट्राचे दोन लालू, पवार-तटकरे जेलमध्ये घालू' असा आवाज भाजपने उठवला होता. पण आता भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांना एकप्रकारे क्निल चीट मिळाल्याने यावर राज्यभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवारांसदर्भातील हा निर्णय हा सरकारने घेतलेला नाही. हा विषय कोर्टाच्या अखत्यारीत असल्याचे दानवे म्हणाले.

कोणी सरकार बनवायला पुढे येत नाही. राज्य अडचणीत असल्यामुे भाजपने राष्ट्रवादीसह सरकार स्थापन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 आजही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यामुळे ते जे व्हीप काढतील तो राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू असेल असेही दानवे म्हणाले.

भाजप विरोधी पक्षाच्या आमदारांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर केला आहे. उलट काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारांना बाऊन्सर सोबत ठेवलं आहे आणि रोज एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले जात आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत असतांना भाजपचे आमदार शेतकरी यांच्या समस्यां जाणून घेत आहेत, फिरत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे. 

संजय राऊत आमच्यावर बेछूट आरोप करत आहेत. सत्ता येण्याची वाट बघणाऱ्या संजय राऊत यांनी वेड लागलं आहे आणि त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे. काय बोलावे काही नाही हे त्यांना समजत नसल्याचा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

सेनेला सिब्बलांची मदत

एवढे नाट्य सुरू असतांना सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेला अजून त्यांचा वकील शोधता आलेला नाही. कपिल सिब्बल यांचे राम मंदिरबद्दलचे आधीचे वक्तव्य बघा, कपिल सिब्बल वर यांनी याआधी सामनामध्ये माकड म्हणून टीका केली होती, आता त्यांचीच मदत सेना घेत केस लढवत आहे.

तीन हजार टेंडर्सची आम्ही चौकशी करत आहोत. ही नियमती चौकशी बंद झाल्या आहेत. बाकीच्या चौकशी सुरु असतील. ज्या फाईली बंद केल्या आहेत त्यावर कोर्टाने अधिक चौकशी मागितली तर फाईली पुन्हा सुरु होऊ शकते असे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.