आदित्य ठाकरे, पार्थ पवारांना अडकवण्याचा फडणवीसांचा डाव होता, अनिल देशमुखांचे खळबळजनक आरोप

Anil Deshmukh On Devendra Fadanvis:  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 29, 2024, 10:48 AM IST
आदित्य ठाकरे, पार्थ पवारांना अडकवण्याचा फडणवीसांचा डाव होता, अनिल देशमुखांचे खळबळजनक आरोप title=
अनिल देशमुखांचे फडणवीसांवर आरोप

Anil Deshmukh On Devendra Fadanvis: राज्याच्या राजकारणाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी गृहमंत्री असताना माझ्याकडे एक माणूस पाठवून मला प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास भाग पाडले जात होते. पण मी तसे केले नाही. मी तसे केले असते तर तेव्हाच सरकार पडले असते. तसेच ठाकरेंना तुरुंगात पाठवायचे प्लानिंग सुरु होते, असेही देशमुखांनी सांगितले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांवर खोटे आरोप कर, असे अॅफिडेव्हिट मला द्यायला सांगितल्याचे देशमुख म्हणाले. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध

मिरजचे समित कदम हे माझ्याकडे आले होते. त्यांचे आणि फडणवीसांचे  घरगुती संबध आहे. समित कदम हा साधारण कार्यकर्ता आहे. तरी सरकारने त्यांना वाय सुरक्षा दिली. मिरजमध्ये तुम्ही चौकशी केली तरी दोघांचे काय संबंध आहे, हे कोणीही सांगेल. उद्धव ठाकरेंना अटक करण्यासाठी षढयंत्र रचल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला. माझ्यावरचा प्रयोग यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला. नंतर अजित पवारांवर केला. तो यशस्वी झाला. माझ्यावरचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तेव्हाच सरकार पडलं असतं. आणि उद्धव ठाकरेंना अटक करण्यात आली असती. 

समित कदमांना वाय दर्जाची सुरक्षा का?

तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं. ते माझ्याकडे एफिडेव्हिट घेऊन आले होते. समित कदम यांचे आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. नगरसेवक नसलेल्या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिलीय. राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. मी तेव्हा सही केली असती तर उद्धव ठाकरे जेल मध्ये असते. समित कदम काळा की गोरा हे मी कधी पाहिलं नाही, असेही त्यांनी सांगितले. 

राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचा फडणवीसांचा डाव

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा फडणवीसांचा डाव होता. जर मी त्या एफिडेविटवर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला तो सुद्धा यशस्वी झालाआदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते.  त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी 300 करोड रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्या मध्ये होता, अशी माहितीही देशमुखांनी दिली.