घाबरू नका, हे सरकार ५ वर्षे चालेल - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना संबोधित केले. 

Updated: Feb 24, 2020, 03:03 PM IST
घाबरू नका, हे सरकार ५ वर्षे चालेल - उद्धव ठाकरे title=

मुंबई : घाबरू नका. हे सरकार ५ वर्षे चालेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना दिला आहे. आमदारांसोबत नुकत्याच संपलेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना संबोधित केले. 

सोनिया गांधी यांना भेटून सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. लोकांच्या मनातील सरकार आम्ही चालवत आहोत. आज कर्जमाफी केली म्हणजे आम्ही काही उपकार केलेले नाहीत. विरोधकांना सडेतोड उत्तर देवू असे मुख्यमंत्री म्हणाले. 

सीएए, एनपीआरच्या मुद्यावरून तिन्ही पक्षामध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा आणि यासंदर्भात सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना आश्वासित केले. 

राष्ट्रीय पातळीवर काही मुद्दे घ्यावे लागतात, परंतु असे काही मुद्दे तुम्ही राज्य पातळीवर सोडवत जा, हाताळत जा अशा सूचना सोनिया गांधी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

तसंच विरोधक कधीही मतदानाची मागणी करू शकतात, त्यामुळे सर्व आमदारांना सभागृहात राहण्यासही त्यांनी सांगितले.