महापालिका निवडणुका पुढे ढकलणार ? मुख्यमंत्री म्हणतात...

सरकार निवडणूक आयोगाशी चर्चा करणार

Updated: Mar 14, 2020, 11:30 PM IST
महापालिका निवडणुका पुढे ढकलणार ? मुख्यमंत्री म्हणतात... title=

मुंबई : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाशी सरकार चर्चा करणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत निवडणूक प्रचार योग्य नाही म्हणून सरकार निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबई आणि औरंगाबाद मनपाच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्या पुढे ढकलण्याची मागणी विविध स्तरातून केली जातेय.

शाळा, महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी शाळांचा समावेश असेल. असे असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील शाळा बंद करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यवतमाळमध्ये दोन रुग्ण 

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आलेत. दोन्ही कोरोनाचे रुग्ण दुबईला गेलेल्या गटातील सदस्य होते. १ मार्चला यवतमाळमधील नऊ जणांचा गट दुबईहून परतला होता. नऊ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. यातल्या दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आलेत. दोघांवरही नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.