घर पेटत होतं आणि मदत करणारेच लुटत होते; चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक

मुंबईच्या चेंबूरमध्ये झालेल्या अग्नि तांडवात मदतीसाठी घरात शिरलेल्यांनीच घर लुटले आहे.   

वनिता कांबळे | Updated: Oct 7, 2024, 06:25 PM IST
घर पेटत होतं आणि मदत करणारेच लुटत होते; चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक

Chembur Fire : मुंबईतील चेंबूरमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली. सिद्धार्थ कॉलनीत ही दुर्घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढलं. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. घर पेटत होत आणि मदत करणारेच घरं लुटत होते. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं?

6 ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात गुप्ता कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीत या कुटुंबातील सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. एकीकडे संपूर्ण मुंबई या घटनेने हळहळत असताना दुसरीकडे ही आग विझविण्याच्या बहाण्याने आत आलेल्या कोणीतरी या घरातील लाखोंच्या एवजावर डल्ला मारण्याचे अमानवी कृत्य केले आहे. या घरातील तिजोरी मध्ये सुमारे साडे चार लाख रोख रक्कम आणि आणि 100 ग्रॅम इतके सोने होते. 

या कुटुंबातील सदस्यांनी या तिजोरीतील कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी या घरात प्रवेश केला असता सदरची तिजोरी तोडलेल्या अवस्थेत आणि त्यातील एवज चोरीला गेलेल्या अवस्थेत आढळून आले. या बाबत या कुटुंबाने आज चेंबूर पोलिसांना तक्रार अर्ज करुन या दागिन्यांचा शोध घेण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. तसेच हे घर उभे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी आज कोणीही अधिकारी या बाबत त्यांच्याकडे फिरकले नसल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे. 

दुर्घटना नेमकी कशी घडली?

घरात सुखशांती नांदावी यासाठी देवघरात पुजेचा दिवा लावला जातो. पण मुंबईतल्या चेंबूरमधील गुप्ता कुटुंबासाठी पूजेचा दिवाच काळ बनलाय. देवघरातल्या पूजेचा दिवा कोसळून लागलेल्या आगीत सिद्धार्थनगरमधील गुप्ता कुटुंबातल्या सात सदस्यांचा मृत्यू झालाय. गुप्ता कुंटुंब तळमजला अधिक दोन माळे अशा घरात वास्तव्य करत होते. पहाटेच्या सुमारास तळमजल्यावरील दुकानात दिवाबत्तीचा दिवा लावण्यात आला. हा दिवा कलंडल्यानंतर आग लागली. ही आग काहीवेळातच भडकली.
तळमजल्यावर लागलेली आग वरच्या दोन्ही मजल्यावर पसरली. वरच्या मजल्यावर झोपलेल्या सात सदस्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. फायरब्रिगेडच्या जवानांनी आग अटोक्यात आणली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More