माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी असताना अत्यवस्थ

Harshvardhan Jadhav : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीतील एका केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आहे. हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आकाश नेटके | Updated: Jul 24, 2023, 03:30 PM IST
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी असताना अत्यवस्थ title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra News : माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे. दिल्लीत (Delhi) एका केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानीच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने एकच खळबळ उडाली होती. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हर्षवर्धन जाधव हे काही कामानिमत्ताने दिल्लीत आले होते. दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी असतानाच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहे. जाधव यांनी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. सध्या जाधव यांची प्रकृती स्थिर आहे.

हर्षवर्धन जाधव यांचा बीएआरएसमध्ये प्रवेश

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन जाधव हे विविध पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

मी मागे हटणार नाही, कुणासमोर झुकणार नाही - हर्षवर्धन जाधव

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात राज्य सरकारने केलेले अपील फेटाळल्यानंतर हर्षवर्धन जाधव आक्रमक झाले होते. मी देवाचे काम करतो आहे, लोकांसाठी काम करतोय. कुणाला घाबरत नाही, स्पष्ट बोलतो हे अनेकांना आवडललेले नाही. म्हणून मला कुठे तरी अडकवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकारने माझा जामीन रद्द करावा, असा अर्ज जाधव यांनी केला होता. "हर्षवर्धन जाधव फार फडफड करतोय, खरे बोलतोय, रोखठोक बोलतोय म्हणून मी सरकारच्या डोळ्यात खूपतोय. 2011 प्रकरणात मला मिळालेली बेल रद्द करावी म्हणून 2022 मध्ये सरकार अर्ज करते. यावरून स्पष्ट होते की ते माझ्या मागे लागलेले आहेत. मला अडकवण्यासाठी काहीही करतील. पण मी मागे हटणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, प्रामाणिकपणे काम करतच राहणार," असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच दिला होता.