कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ, एक समिती गठीत करा - उदय सामंत

कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत बैठकीत आढावा.

Updated: Jan 11, 2020, 12:12 PM IST
कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ, एक समिती गठीत करा - उदय सामंत  title=
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली.

मुंबई : कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भात विधानभवनात कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सामंत यांनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक आहे, असे सांगत त्यासाठी एक समिती गठीत करावी असे आदेश, मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. त्यामुळे कोकणला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याबाबत हालचाल सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक आहे, असे आढावा बैठकीत एकमत झाले. कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेता येईल, असेही यावेळी सूचविण्यात आले. यावर विचार करुन कोकणला स्वतंत्र विद्यापीठ असावे, त्यासाठी ही समिती गठीत करण्याचे आदेश दिल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, विलास पाटणे, रमेश कीर उपस्थित होते.

संत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समिती गठित

दरम्यान, महाराष्ट्राला महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. राज्यात पैठण येथे संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी, अशी अनेक वर्षामपासूनची मागणी आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समिती गठित करण्यात यावी. या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ मार्गदर्शक असलेल्या व्यक्तींचा समावेश असावा, असेही सामंत यांनी सांगितले.