राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'

LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 23, 2024, 11:20 AM IST
राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'  title=

LokSabha Election: जर ठरवलं तर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे. महायुतीत जागावाटपावरुन कोणताही तिढा नसून, आमच्यात चर्चा सुरु आहे जी 5 ते 10 मिनिटात संपू शकते असं ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. तसंच राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता असल्याने तिढा झाल्याचा दावाही फेटाळला. 

राज ठाकरेंच्या पक्षाला शिवसेनेत समाविष्ट करुन, अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आहे का? असं विचारण्यात आलं असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, "शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यासंबंधी निर्णय घेतील. एकनाथ शिंदेचा पक्ष काय ते ठरवेल. आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेऊ". तसंच मनसेमुळे जागावाटपात उशीर होत असल्याचा दावाही त्यांनी फेटाळला. "मनसेमुळे उशीर होत नाही आहे. अंतिम चर्चा झाली असून लवकरच शिक्कामोर्तब होईल," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. 

"जागावाटपाबाबत 2 ते 3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. महायुती म्हणून आम्ही 13 पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. बूथवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. 51 टक्के मतं मिळतील अशी आम्हाला आशा आहे. नरेंद्र मोदींनी सुरु केल्या योजना आणि महाराष्ट्राला केलेली मदत यामुळे आम्हाला मतं मिळतील. काँग्रेसची 65 आणि मोदींची 10 वर्षं यांची तुलना केल्यास मोदींची 10 वर्षं वरचढ ठरतात. जनतेलाही विकसित भारतासाठी मोदींना साथ दिली पाहिजे हे आता समजलं आहे," असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के वाढतील असं दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

"आमचा तिढा नाही. आमच्यात चर्चा सुरु आहे. ती 5 ते 10 मिनिटात संपू शकते," असं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच अमरावतीची जागा भाजपाच लढणार असून, भाजपाचाच उमेदवार असेल असंही स्पष्ट केलं. "कोण प्रवेश करणार, कोण नाही यापेक्षा अमरावतीची जागा भाजपाच लढणार, भाजपाचाच उमेदवार असेल हे महत्वाचं आहे. आनंदराव अडसूळ, बच्चू कडू या सर्वांची मदत घेऊन आणि 100 टक्के जिंकू. सर्व घटक पक्षांची मदत घेऊ आणि ते करतील असा विश्वास आहे," असं ते म्हणाले. 

"अशा अनेक जागा आहे जिथे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीची प्रत्येकाची ताकद असून उमेदवार जिंकू शकतो. सर्वांचं महत्व लक्षात घेऊनच जागावाटप केलं जाईल. एकनाथ शिंदे, अजित पवार यांची प्रतिष्ठा राखत त्यांना सोबत ठेवायचं ही भाजपाची भूमिका आहे. 4 ते 5 मिनिटांत चर्चा संपेल इतकं सोपं आहे. आम्ही चाचपणी करत असून, राज्य आणि केंद्रातील नेतृत्व पुढाकार घेत जागावाटप करत आहे," असं चंद्रशेखर  बावनकुळेंनी सांगितलं.