राज्यात मोठी दुर्घटना : नदीत बोट उलटून 11 जण बुडाले

वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले अजून यातील 8 जण अद्याप बेपत्ता आहेत.  

Updated: Sep 14, 2021, 02:59 PM IST
राज्यात मोठी दुर्घटना : नदीत बोट उलटून 11 जण बुडाले title=

अमरावती : राज्यात विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज सकाळी वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले अजून यातील 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अमरावतीच्या गाळेगाव येथील धक्कादायक घटना आहे. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून 8 जणांचा शोध घेण्यात येत आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बुडालेले सर्वजण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते अशी माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु केला आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जोरदार पाऊस असल्याने अद्याप आठ जणांचा शोध लागलेला नाही. जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आज वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. त्याचवेळी अचानक नाव उलटली. 

11 जणांमध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे. मोर्शीवरून मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.