सत्तासंघर्षावरुन भाजप-शिवसेनेला मोहन भागवत यांचा टोला

भाजप आणि शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Updated: Nov 19, 2019, 07:36 PM IST
सत्तासंघर्षावरुन भाजप-शिवसेनेला मोहन भागवत यांचा टोला title=

नागपूर : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. दोघांच्या भांडणात नेहमीच नुकसान होते. पण तरीही ते भांडण थांबवत नाहीत, असे भागवतांनी नागपूरातील एका कार्यक्रम बोलताना सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात कुणाचंही नाव घेतलेले नाही. मात्र, स्वार्थामुळे नुकसान होते याची जाणीव असतानाही लोक स्वार्थ सोडत नाहीत. हे तत्व देशांना आणि व्यक्तींनाही लागू होते, असा टोला सरसंघचालकांनी लगावला.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी पडली आणि युती तुटली. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. भाजपने मुख्यमंत्री पद कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, युती करताना जे काही ठरले आहे, ते आम्ही मागत आहोत असे शिवसेनेकडून जाहीररित्या सांगण्यात येत होते. त्याचवेळी भाजपकडून असे काहीही ठरले नाही, असे सांगत अर्धा-अर्धा वाटा असे काहीही ठरले नव्हते. शिवसेनेची ही नवी मागणी आहे, असे सांगण्यात येत होते.

मात्र, युतीबाबत बोलणी करण्याबाबत हालचाल न होता तणाव वाढ गेला आणि शिवसेनेने टोकाचा निर्णय घेत बोलणी थांबवली. त्यानंतर राज्यात नवी समीकरणे येणार असे संकेत दिसत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी संपर्क शिवसेनेने केला आणि त्यानंतर सत्तेसाठी नव्या हालचाली सुरु झाल्यात. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एक समन्वय समिती नेमण्यात आली. या समितीने एक समान कार्यक्रम आखला आणि बोलणी सुरु केली. आता ही बोलणी सुरुच आहेत. त्यामुळे राज्यात नवे सरकार येणार का, याची उत्सुकता आहे. 

 तर दुसरीकडे शिवसेना आक्रमक झाली असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. तीन वर्षे भाजप आणि दोन वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याच्या प्रस्तावाबाबत आपण शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. आपण भाजप नेत्यांशी लवकरच याबाबत चर्चा करू असे ते म्हणाले. आपण मांडलेला प्रस्ताव संजय राऊत यांना मान्य आहे. त्यामुळे याआता पुढची पायरी म्हणून आपण यासंदर्भात भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहे, असे आठवले म्हणालेत.